समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, पण याचा अर्थ समलिंगी लोक कुटुंब बनवू शकत नाहीत, असा होत नाही. समलिंगी लोक परिवार बनवू शकतात, असा स्पष्ट निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला. न्या. जी. आर. स्वामीनाथन आणि न्या. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
चेन्नई उच्च न्यायालयासमोर एका समलिंगी जोडप्याचे प्रकरण सुनावणीसाठी आले. या जोडप्यातील महिलेला तिच्या कुटुंबाने जबरदस्तीने डांबून ठेवले होते. तिच्या सहकारी महिलेने पोलिसांची मदत मागितली. परंतु पोलिसांनी त्या कुटुंबाचीच मदत केली. अखेर त्या जोडीदार महिलेने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर डांबून ठेवलेल्या महिलेच्या आईने आपल्या मुलीला भ्रमित करण्यात आल्याचा आरोप केला. मात्र न्या. जी. आर. स्वामीनाथन आणि न्या. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या खंडपीठाने हा आरोप फेटाळला. दोन्ही महिलांची एकत्र राहण्याची इच्छा आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. समाज अजूनही समलिंगी संबंध स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये नसल्याची खंतही खंडपीठाने व्यक्त केली.
लैंगिक प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. घटनेच्या कलम 21 अनुसार या दोन्ही गोष्टी खासगी स्वातंत्र्यात मोडतात. यावेळी खंडपीठाने ‘क्वीर’ या शब्दावरही आक्षेप घेतला. ‘क्वीर’ या शब्दाचा अर्थ अजब किंवा असामान्य असा आहे. समलिंगी व्यक्तीची लैंगिक ओळख ही पूर्णत: सामान्य असते त्यामुळे त्यांना ‘क्वीर’ का म्हणावे असा प्रश्नही खंडपीठाने विचारला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List