रायगडावर शिवकाल अवतरला! शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा जल्लोषात
निश्चयाचा महामेरू आणि बहुत जनासी आधारू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आज हजारो शिवभक्तांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर कूच केली. तिथीनुसार 352 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी राजधानीमध्ये तुफान गर्दी झाली होती. लाडक्या राजावर सुवर्णाभिषेक करण्यात आला तेव्हा तर सर्वांचा आनंद टीपेला पोहोचला. महाराजांची वाजतगाजत निघालेली पालखी.. मावळ्यांनी केलेली तलवारबाजी आणि दांडपट्ट्यांची प्रात्यक्षिके यामुळे रायगडावर जणू शिवकाल अवतरला होता. सर्वत्र फडकणारे भगवे झेंडे, शिवभक्तांचा उत्साह तसेच छत्रपतींच्या जयजयकाराने आसमंत दणाणून गेला.
दुर्गराज रायगड आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आज भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन रायगडावर करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून विविध प्रकारच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. प्रथम नगारखाना येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम पार पडला. तसेच हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पालखीचे आगमन झाले तेव्हा ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांचा जयघोष यामुळे किल्ल्यावरील संपूर्ण वातावरण शिवमय झाले.
सप्तगंगा स्नान मंत्रोच्चार सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पंचामृत व सप्त नद्यांच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर मूर्तीचे विधिवत पूजन केले. शिवभक्तांनी छत्रपतींची संबळच्या निनादात आरतीदेखील केली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. ढोलताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखनाद यामुळे किल्ल्यावर भक्ती व शक्तीचा अपूर्व संगम झाला होता.
मंत्रोच्चाराच्या जयघोषात सुवर्णाभिषेक
मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये श्री शिवछत्रपतींना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. जगदीश्वराच्या मंदिरात उपस्थित वारकऱ्यांना पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान केला. छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने शिवभक्त आले होते.
राष्ट्रीय सणाचा दर्जा द्या !
हिंदुस्थानला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याची स्थापना करून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवसाला पहिला स्वातंत्र्य दिन असे संबोधण्यात यावे तसेच त्यास राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी याप्रसंगी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List