कर्ज स्वस्त मात्र जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे येणाऱया काळात कर्ज आणखी स्वस्त होणार आहे. एकीकडे कर्ज स्वस्त होत असताना दुसरीकडे मात्र, भाज्यांसह जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडल्यामुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. ‘भाज्या महाग, पण कर्ज स्वस्त’ अशी विचित्र परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केल्यामुळे रेपो रेट आता 5.50 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली. बँका आरबीआयकडून ज्या व्याजदराने कर्ज घेतात, त्या व्याजदराला ‘रेपो रेट’ म्हणतात. बँका मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजदर सामान्यतः या दराच्या आधारे निश्चित केले जातात. रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे खासगी आणि सार्वजनिक बँकाकडून गृह आणि वाहनकर्जाचे व्याजदर घटवले जाण्याची शक्यता आहे.
कर्ज स्वस्त होत असताना दुसरीकडे धान्य, कडधान्य, तेल, डाळी अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे सातत्याने दर वाढत आहेत. त्यातच सतत कोसळणाऱया पावसामुळे विदर्भ, मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रातून होणारी भाज्यांची आवक घटली आहे. याचाही फटका ग्राहकांना बसतोय. काही दिवसांपूर्वी 15 रुपयांना मिळणाऱया पालकच्या जुडीसाठी आता 50 रुपये मोजावे लागतायत. मेथीची जुडी 20 रुपयांवरून 60 रुपयांवर पोहोचली आहे. फ्लॉवर, सिमला मिर्चीने शंभरी गाठली असून हिरवा वाटाणा दीडशे रुपये किलो आहे. भाज्यांच्या दरावरून ग्राहक आणि भाजी विक्रेत्यांमध्ये खटके उडत आहेत.
सलग तिसऱयांदा व्याजदरात कपात
आरबीआयकडून सलग तिसऱयांदा व्याजदरात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सलग दोनवेळा रेपो रेटमध्ये प्रत्येकी 0.25 टक्क्यांची कपात केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची घसघशीत कपात करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List