पर्यटकांचा अतिउत्साह ठरतोय जीवघेणा; सूचना फलकांकडे दुर्लक्ष

पर्यटकांचा अतिउत्साह ठरतोय जीवघेणा; सूचना फलकांकडे दुर्लक्ष

पावसाळा सुरू होताच, मुंबई, पुणे शहरांतील पर्यटकांची पावले आपोआप लोणावळ्याजवळील भुशी डॅमबरोबरच लोणावळ्यातील विविध पॉइंट्स, मावळातील धबधबे, गडकिल्ल्यांकडे वळतात. निसर्गरम्य मावळ तालुक्यात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक हजेरी लावतात. यात हौसे, नवसे व गवशांचा समावेश असतो. असंख्य पर्यटक भुशी डॅम आणि इतरत्र धबधब्याखाली ओलेचिंब होण्यासाठी, तर काही पर्यटक या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. अशावेळी अतिउत्साही पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यास दुर्घटनाही वाढतात.

राजगड किल्ल्यावर बालेकिल्ला परिसरात फोटो काढत असताना, पाय घसरून आळंदी येथील कोमल सतीश शिंदे (वय २३) यांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. योगेश रघुनाथ दरडिगे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला कळवले. पोलीस प्रशासनाने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला संपर्क साधून मदतीसाठी बोलावले.

काही वेळातच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि कोमल शिंदे यांचा मृतदेह शोधून काढून पोलीस प्रशासन व नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वेल्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरगे, संदीप सोलस्कर, नीलेश जाधव, सनी माने, योगेश दरडिगे, विश्वास शिर्के आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी युवराज सोमवंशी सहभागी झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे राजगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, येणाऱ्या पर्यटकांनी गड-किल्ल्यांवर जाताना विशेष काळजी घेतली पाहिजे, असे स्थानिकांनी सांगितले.

लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव आणि विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. वर्षाविहारासाठी ग्रामीण भागातील भाजे लेणी धबधबा, कार्ला लेणी धबधबा, लोहगड व विसापूर किल्ला परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याशिवाय लोणावळ्यातील लाइन्स पॉइंट, टायगर पॉइंट, घुबड तलाव, तुंगार्ली डॅम, अमृतांजन पॉइंट, राजमाची पॉइंट याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. लोणावळ्यापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत. पावसाळा सुरू झाला की, अनेकजण मित्र-मैत्रिणींसह पिकनिकची तयारी करतात. वर्षाविहारासाठी मुंबईकर, पुणेकरांची पावले लोणावळ्यातील भुशी डॅम, लोणावळ्यातील विविध पॉइंट्स, गड-किल्ले, धबधब्यांकडे वळतात.

गेल्या काही वर्षांत वीकेण्ड साजरा करण्याचे नवीनच फॅड उदयास आले आहे. डोंगररांगांवरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. या धबधब्यातून फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातात. अशावेळी पर्यटकांच्या गर्दीला आवर घालणे प्रशासनाला अशक्य होते.

भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्यात गेल्या वर्षी एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले. हडपसर येथील लियाकत अन्सारी व युनूस खान हे गेल्या ३० जून २०२४ रोजी त्यांचे १७ ते १८ कुटुंब सदस्यांसह वर्षाविहाराकरिता लोणावळ्यात आले होते. भुशी धरणाच्या मागील बाजूला एका धबधब्याच्या प्रवाहात ही मंडळी उभी असताना, पाण्याचा प्रवाह वाढल्याने दहाजण पाण्यात वाहून गेले. यापैकी पाचजणांना पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र, ४ ते १३ वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच महिला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात अपयशी ठरले. मारिया अकील अन्सारी (वय ९), अदनान सबाहत अन्सारी (वय ४), साहिस्ता लियाकत अन्सारी (वय ३७), अमिना सलमान ऊर्फ आदिल अन्सारी (वय १३) आणि उमेरा सलमान ऊर्फ आदिल अन्सारी (वय ८) हे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने निर्बंध लागू केले होते.

अतिउत्साह, सेल्फीचा मोह ठरतोय दुर्घटनेला आमंत्रण
लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. त्यामुळे तेथे तर अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसते. त्यातच अतिउत्साहाच्या भरात पाण्याचा अंदाज न घेताच, पोहण्यास उतरणे, जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे आणि पुरेशी माहिती नसताना, गड-कोटांवर भ्रमंती करणे म्हणजे दुर्घटनेला सरळ सरळ आमंत्रण देण्यासारखेच असते. पर्यटकांमध्ये अनेक तरुण-तरुणींचे तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींचे समूह असतात. या समूहांमधील काही अतिउत्साही मुले ही धोकादायक पद्धतीने पर्यटन करतात. यामधून आतापर्यंत धरणांमध्ये बुडून मृत्युमुखी होण्याच्या घटना, डोंगरदऱ्यांमध्ये पाय घसरून धबधब्यामध्ये पडल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. अतिउत्साहामुळे अनेक दुर्घटना घडतात. ताम्हिणी येथील मिल्की बार धबधबा येथे पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भुशी धरणात घडलेल्या घटनेत चार चिमुकल्यांसह पाचजणांचा बळी गेला. लोणावळा परिसरात यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येते.

सूचनाफलकांकडे दुर्लक्ष
लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने जागोजागी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. लायन्स पॉइंट या ठिकाणी दरीच्या तोंडाला लोखंडी रेलिंग करण्यात आली आहे. राजमाची पॉइंट खंडाळा येथेदेखील सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे. पर्यटकांनी या रेलिंग व जाळीच्या पुढे जाण्याचा मोह टाळला पाहिजे. मात्र, उत्साहाच्या भरात पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. सेल्फी घेण्यासाठी अनेकवेळा तरुण-तरुणी धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन फोटो काढण्याचे प्रयत्न केले जातात. तर, धरणांमध्ये पाणीसाठा वाढलेला आहे, हे माहीत असतानादेखील धरणांमध्ये पोहण्यासाठी उतरतात. यामधून अनेक प्राणांतिक घटना घडतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – घेरा यशवंतगडाच्या कोसळलेल्या कामाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा, माजी आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी Ratnagiri News – घेरा यशवंतगडाच्या कोसळलेल्या कामाची चौकशी करून ठेकेदाराचा ठेका रद्द करा, माजी आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे, नाटे परिसरातील ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करावी आणि दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम, प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना संधी द्या – शरद पवार
एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आषाढी यात्रेतील गर्दीवर नियंत्रण आणणार, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची माहिती
बीडमध्ये पोलिसाांच्या कार्याला सलाम! शेकडो वृद्धांना पाठीवर घेऊन कथास्थळापर्यंत पोहोचवले
Ratnagiri News – दापोली तालुक्यात केळशी सजाचे तलाठी 20 हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात
तळीरामांच्या खिशाला कात्री! दारुवरील उत्पादन शुल्कात वाढ