अहिल्यानगरमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; चार सदस्यीय प्रभाग रचना होणार
अहिल्यानगर महापालिकेसह राज्यातील ‘ड’ वर्गात असलेल्या 19 महानगरपालिकांच्या प्रभागरचनेचे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. प्रभागरचना करताना सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेची लोकसंख्या गृहीत धरली जाणार असल्याने हद्दवाढ झालेल्या महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये प्रभागांची व नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे. प्रत्येक प्रभागात चार सदस्य असणार आहेत. यानुसार गेल्यावेळेपेक्षा या निवडणुकीत नगर महापालिकेत नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे. दरम्यान, आता इच्छुकांना निवडणुकीची घाई झाली असून, आत्तापासूनच आखणी सुरू केली आहे.
अहिल्यानगर शहरात वाढीव मतदारांची संख्या गृहीत धरल्यास प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत 17 प्रभाग होते अन् 68 नगरसेवकांची संख्या होती. आता नव्याने किती नगरसेवकांची संख्या वाढते, याची सर्वांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे कोणाचे प्रभाग वगळले जातात व कोण कुठल्या प्रभागाला जोडले जातात, याची चाचपणी सुरू आहे. विशेष म्हणजे जुन्या नगरसेवकांनीसुद्धा आपल्या प्रभागाची रचना पाहून त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे.
नगरसेवकांच्या संख्येकडे लागले लक्ष
अहिल्यानगर महापालिकेत प्रभागरचना करण्याचे अधिकार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना आहेत. डांगे यांनी तयार केलेली प्रारूप प्रभागरचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सादर करावी लागणार आहे. त्यानंतर या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही प्रारूप प्रभागांची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. अहिल्यानगर शहरात वाढीव मतदारांची संख्या गृहीत धरल्यास प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत 17 प्रभाग होते अन् 68 नगरसेवकांची संख्या होती.
अडीच महिन्यांचा कालावधी अपेक्षित
आयुक्तांनी प्रभागरचना तयार केल्यावर राज्य निवडणूक आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवावे लागेल. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांचे प्रारूप जाहीर केले जाईल. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी करून प्रभागांची अंतिम रचना निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली जाईल. ही आठ टप्प्यांतील प्रक्रिया पार पडण्यासाठी किमान अडीच महिने लागू शकतात. म्हणजेच ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात प्रभागांची अंतिम रचना जाहीर होईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाईल. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जाते.
एका प्रभागात किती मतदार
प्रभागरचना करताना महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या 10 टक्के कमी किंवा 10 टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येईल. प्रभागरचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात केली जाणार आहे. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत प्रभागरचनेचा शेवट महापालिका क्षेत्राच्या दक्षिण दिशेला केला जाणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने दिले जाणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List