सोनमला दीदी म्हणायचा, राखी बांधून घ्यायचा; राज कुशवाहच्या बहिणीच्या दाव्यानं राजा रघुवंशी हत्याकांडाचं गूढ वाढलं
मध्य प्रदेशमधील इंदूर येथून मधुचंद्रासाठी मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन केल्याचे उघड झाले. सोनमने कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून हत्याकांडाचे षडयंत्र रचल्याचे मेघालय पोलिसांनी स्पष्ट केले आणि तिच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर या हत्याकांड प्रकरणात एकामागोमाग एक खुलासे होत असून आताही एक चकीत करणारी बातमी समोर आली आहे.
राज कुशवाह हा सोनम रघुवंशी हिला सर्वासमोर दीदी म्हणायचा, एवढेच नाही तर दरवर्षी राखीपौर्णिमेला तिच्याकडून राखीही बांधून घ्यायचा, असा दावा राजच्या बहिणीने केला आहे. माध्यमांशी बोलताना केलेल्या या दाव्यामुळे राजा रघुवंशी हत्याकांडाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी राज कुशवाह याची बहीण सुहानी हिने माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. माझा भाऊ निर्दोष आहे. राज सोनमला दीदी म्हणायचा. तो तिच्यासोबत फक्त कार्यालयीन कामकाजासंदर्भातच बोलायचा, असे सुहानी हिने म्हटले. एवढेच नाही तर सोनमबद्दल त्याने घरीही कधी चर्चा केली नाही, असेही सुहानी हिने सांगितले.
माझा भाऊ सोनमसोबत रिलेशनशिपमध्ये कसा असेल? तो तिला दीदी म्हणायचा. तो तिच्या ऑफिसमध्ये दोन वर्ष काम करत होता. सोनम सकाळी कॉल करायची, तेव्हा कधीकधी आम्ही फोन घ्यायचो आणि तो लवकर कामावर पोहोचेन असा निरोप द्यायचो. ते फक्त कामाबद्दल बोलत. त्यांच्या नियमित संवादही नव्हता, असेही सुहानी हिने सांगितले. तसेच राजा रघुवंशीही हत्या झाली तेव्हा राज इंदूरमध्येच होता, असेही तिने सांगितले.
सात जन्माचे नाते… पतीची हत्या केल्यानंतर सोनमने त्याच्या सोशल मीडियावर टाकली पोस्ट
सोनम आणि राजा रघुवंशी यांचे 11 मे रोजी लग्न झाले. या लग्नाला आमच्या कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते, कारण त्यावेळी आम्ही सर्व गावी गेलो होतो. राज कुशवाह इंदूरमध्येच होता, पण तो लग्नाला उपस्थित नव्हता. कारण त्याच दिवशी वडिलांसोबत काहीतरी घडले होते आणि त्यामुळे कुटुंबातील कुणीही सोहळ्याला गेले नव्हते. दीदीने लग्न केल्यानंतरही राजच्या वागण्यात काही बदल जाणवला नाही, असेही सुहानीने सांगितले. तसेच राज असे काही करेल यावर आमचा विश्वास नसून आम्हाला फक्त न्याय मिळावा अशी इच्छा आहे, असेही ती म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List