नितेश राणेंसारख्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी समज द्या – आमदार नायकवडी
बकरी ईदविषयी चुकीची आणि वादग्रस्त वक्तव्ये करून दोन समाजांत द्वेष पसरविण्याचे काम राज्यातील मंत्री नीतेश राणे यांच्याकडून सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी बालिश उद्योग करणाऱ्या वाचाळवीर नीतेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीस यांनी समज द्यावी. नाहीतर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, ‘मंत्री नीतेश राणेंसारख्या अपरिपक्व माणसाला आम्ही यापुढे उत्तर देत बसणार नाही, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करू, मुस्लीम समाज संयमी आहे. नीतेश राणे यांनी त्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबवली नाहीत तर मात्र यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल’, असा इशारा आमदार नायकवडी यांनी दिला.
आपल्या ज्ञानाचे कोणी कसे प्रदर्शन करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, गेली पंधरा वर्षे आमदार असणाऱ्या सुरेश खाडे यांनी बजेटविषयी अभ्यास करून मगच बोलावे, असा टोलाही आमदार इद्रिस नायकवडी यांनी लगावला. राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनसुद्धा मिरजेच्या समस्या सोडविण्यामध्ये आमदार सुरेश खाडे कमी पडले आहेत, असा स्पष्ट आरोपही आमदार नायकवडी यांनी या वेळी केला.
महायुतीतील घटक पक्षातील आमदाराकडूनच थेट मंत्री राणे आणि माजी मंत्री व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या कारभाराचे वाभाडे काढत आमदार नायकवडी यांनी महायुतीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने भाजपसह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List