संस्कृती-बिंस्कृती- गधेगाळ : एक सांस्कृतिक दस्तावेज

संस्कृती-बिंस्कृती- गधेगाळ : एक सांस्कृतिक दस्तावेज

>> डॉ. मुकुंद कुळे

महाराष्ट्रात शिलाहारांपासून ते यादव काळ ते अगदी शिवपूर्व काळापर्यंत (बहामनी राज्य) हे शापवाणीयुक्त शिलालेख सर्रास सापडतात. हे सारेच शिलालेख साधारणपणे नऊ ते पंधरा या शतकातील आहेत आणि हे प्रामुख्याने मंदिर किंवा देवस्थानांना राजाने दिलेल्या विविध प्रकारच्या दान वा देणगीच्या निमित्ताने कोरण्यात आलेले आहेत. मात्र हे शिलालेख कोरताना, जवळजवळ प्रत्येकाने दानपत्राबरोबरच अर्वाच्य आणि अभद्र अशी शापवाणीही कोरलेली आहे. किंबहुना राजाज्ञेचे पालन न करणाऱयाला सणसणीत शिवीच घातली आहे… आणि ही शिवी मुख्यत्वे त्याच्या आईवरून घातलेली आहे. कारण शेवटी आई हा कुणाचाही संवेदनशील-नाजूक-हळवा कोपरा असतो. बहुधा ही मानसिकता तत्कालीन राजेशाहीला ठाऊक असावी आणि म्हणूनच आपल्या आदेशाचे सगळ्यांनी निमूट पालन करावे, यासाठी त्यांनी आज्ञा मोडणाऱयाला एकप्रकारे त्याच्या आईवरून शिवी घातलेली आहे. अशा शिलालेखांविषयी…

 

‘गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।

स्त्राr कोंकणा चक्री- वर्ती। स्त्राr केसीदेवराय।

महाप्रधा– न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।

सकु संवतुः 934 प्रधा- वी सवसरेः अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।

भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु। महालषु– मीची वआण। लुनया कचली ज-’

संस्कृत आणि मराठी भाषेचं मिश्रण असलेला हा शके 934 (इसवी सन 1012) मधला शिलालेख. या शिलालेखातील मजकुराचा अर्थ असा… ‘कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री कोकण चक्रवर्ती श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत 934 प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो…’

मात्र रायगड जिह्यातील अलिबाग-चौल-रेवदंडा मार्गावरील अक्षी गावात सापडलेल्या मराठीतील या आद्य शिलालेखात पुढे एक घृणास्पद शापवाणीही कोरलेली आहे. ‘हे शासन (राजाज्ञा) जो कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झविजे.’

हा शिलालेख ज्या कुणी कोरून घेतलेला आहे, तो ही शापवाणी केवळ शब्दांकित करून थांबलेला नाही; त्याने ती शिल्पांकितही केलेली आहे. शिल्पांच्या माध्यमातून कोरलेल्या अशा शापवाणीचे दाखले अनेक मिळतात. या प्रकारच्या अश्लील शापवाणीतून तत्कालीन मुस्लीम समाजही सुटलेला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, रायगड जिह्यातील दाभोळ येथील जामा मशिदीत सापडलेला मराठी शिलालेख. शापवाणी कोरलेल्या या शिलालेखात म्हटलंय-

‘यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल, त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे.’

(जो हिंदू अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील, त्याच्या आईवर गाढव चढेल, हे पक्के जाणून असा…)

अर्थात अशी शापवाणीयुक्त शिळा कोरण्यामागचा राजाचा-शासनकर्त्याचा हेतू काहीही असो, प्रत्यक्षात त्याला स्त्राrची अवहेलना करायची असो व नसो; पण कळत नकळत त्याच्याकडून स्त्राr लज्जित होते, एवढं नक्की… आणि म्हणूनच या शापवाणीयुक्त शिलालेखांकडे केवळ ऐतिहासिक वस्तू-वारसा म्हणून पाहण्याऐवजी, त्यांच्याकडे सामाजिक-सांस्कृतिक अंगानेही पाहिलं पाहिजे. कोणत्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय अवकाशात तत्कालीन शासनकर्त्यांना हे शापवाणीयुक्त शिलालेख कोरावेसे वाटले, शिलाहारपूर्वकाळात महाराष्ट्रात असे शिलालेख का सापडत नाहीत आणि शापवाणी कोरताना त्यांनी गाढवासारख्या प्राण्याचीच निवड का केली? काळाच्या पटलावर कोणतीही घटना सहज किंवा आपसूक घडत नसते. तिच्यामागे काही ना काही कार्यकारण भाव असतो. काळाचा, परिस्थितीचा रेटा असतो. त्यामुळे या साऱया मुद्दय़ांच्या परिप्रेक्ष्यातच या शापवाणीयुक्त शिलालेखांकडे पाहायला हवं.

या शापवाणीयुक्त शिलालेखांसाठी वापरण्यात आलेली शिळा, वीरगळांसाठी (वीरांच्या स्मरणार्थ उभारलेली शिळाशिल्पं) वापरण्यात आलेल्या शिळेसारखीच (पाटास्वरूप आणि चार ते पाच फूट उंच) असते. काहीशा चपटय़ा असलेल्या या शिळेच्या वरील भागात चंद्र आणि सूर्य कोरलेले असतात. चंद्र-सूर्याच्या या प्रतिमा त्या-त्या राजाची राजवट एकप्रकारे चंद्र-सूर्य असेपर्यंत शाबूत राहणार असल्याचं दर्शवत असतात. त्यानंतर मधल्या भागात राजाने दिलेलं दानपत्र कोरलेलं असतं. दानपत्राच्या खालीच अर्वाच्य भाषेतील शापवाणी कोरलेली असते. ही शापवाणी शक्यतो संस्कृतऐवजी स्थानिक भाषेतच कोरलेली असते. जेणेकरून ती सर्वसामान्यांना वाचता यावी.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्राrवर गाढव आरूढ होण्याची शापवाणी असल्यामुळे, ही शापवाणी कोरलेल्या शिळाखंडाना सरसकट ‘गधेगाळ’ किंवा ‘गधेगळ’ असं म्हटलं जातं. गाढवावरून दिलेली शिवी असल्यामुळेच हे नामाभिधान या शिळांना मिळालेलं आहे. अगदी मराठी भाषेतिहासातही ‘गधेगळ’ हाच शब्द वापरण्यात आला आहे आणि तो ‘वीरगळ’ या शब्दाच्या धर्तीवर तयार झालेला आहे. वीरगळ शब्दाची व्युत्पत्ती सांगताना ती वीरगळ अशी केली जाते. वीर म्हणजे शूरवीर-पराक्रमी, तर गळ हा शब्द कन्नडमधून आलेला आहे. कन्नडमध्ये कोणत्याही दगडाला कल्लू म्हणतात, तर कोनशिलेसारख्या दगडाला गल्लू म्हणतात. त्यामुळे वीरगळमधला ‘गळ’ हा शब्द कन्नडमधील कल्लू किंवा गल्लूचा अपभ्रंश आहे, हे नक्की. त्यामुळे वीरगळाचा अर्थ ‘वीराचा दगड’ असा होतो. साहजिकच वीरगळ आणि गधेगळ किंवा गधेगाळ यातील ‘गळ’ शब्दाच्या साधर्म्यामुळे गधेगळ म्हणजे ‘गाढवाचा दगड’ असा शब्दश अर्थ होतो. मात्र ‘वीरगळ’प्रमाणे ‘गधेगळ’ व्युत्पत्ती योजली आणि कदाचित ती खरी असली, तरी ‘गधेगळ’ या संबोधनात ‘गधा’ हा हिंदी शब्द का वापरण्यात आला आहे, ते कळत नाही. जर गधेगळा असलेली शिल्पं प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळत असतील, तर मग त्यांचं संबोधन ‘गाढवगाळ’ का नाही? की ‘गधेगाळ’ हा शब्दच हिंदीवरून आलेला आहे? कारण गधा हा शब्द तर थेट हिंदी आहेच, परंतु गाळ हा शब्द हिंदीतील ‘गाली’चा (म्हणजेच शिवीचा) अपभ्रंश असू शकतो. तसंही आपण मराठीत ‘शिवीगाळ’ हा शब्द वापरतो. म्हणजे कदाचित वीरगळधील ‘गळ’ हा शब्द कन्नडवरून आलेला असू शकतो. परंतु गधेगाळमधील ‘गाळ’ शब्द दगडनिदर्शक नसून तो संस्कृत-हिंदीतील शिवीनिदर्शक ‘गाली’ शब्दावरून आलेला शब्द असावा. मात्र अगदी पूर्वीपासून अशा प्रकारच्या शापवाणीयुक्त शिलालेखासाठी ‘गधेगाळ’ हाच शब्द रूढ आहे, एवढं खरं!

शेवटी गधेगाळ म्हणजे काय तर, शासकाची आज्ञा कुणी मोडल्यास, त्याच्या आईवर (किंवा परिस्थितीवश त्याच्या पत्नीवर) गाढव आरूढ होईल, असा दिलेला शाप. प्राचीन काळी अश्वमेधासारख्या यज्ञप्रसंगी अश्व आणि यज्ञाचा यजमान असलेल्या राणीचा संयोग घडवून आणतच असत. त्याचे दाखले पुराणग्रंथात अनेक सापडतात. त्यात अश्व हा पुरुषत्व आणि पराक्रमाचा प्रतीक. किंबहुना घोडय़ाला पूर्ण पुरुष मानलं जातं. कारण त्याला स्तन नसतात. मग घोडय़ासारखा वीर्यरसाने फुरफुरणारा प्राणी असताना, शापवाणी असलेल्या शिळाशिल्पांमध्ये घोडय़ाऐवजी गाढवाची (क्वचित काही शापयुक्त शिलालेखांमध्ये स्त्राrवर घोडा किंवा हत्तीही आरूढ झाल्याचं दाखवलं आहे.) योजना का केलेली आहे? खरं तर घोडा काय किंवा गाढव काय, स्त्राrसोबत एखादा प्राणी रत होण्याची कल्पना शापवाणीतही निषेधार्हच आहे. तरीही स्त्राrसोबत गाढव का, याची उकल व्हायला हवी. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ‘लोकसाहित्य ः शोध आणि समीक्षा’ या पुस्तकातील ‘शिवी आणि समाजोतिहास’ लेखात या प्रश्नाचा मागोवा घेतला आहे. ते म्हणतात- ‘घोडा आणि गाढव हे दोन्ही एकाच वर्गातील प्राणी असले, तरी घोडा हा केव्हाही अप्रतिष्ठित, अशुभ किंवा अमंगल मानला गेलेला नाही. उलट तो शौर्य आणि सौष्ठव यांचं प्रतीक मानला गेला आहे. तर गाढवाचा निकटचा संबंध शीतला, ज्येष्ठा आणि निऋती या तीनही अशुभ व विघ्नकर देवतांशी असल्यामुळे, त्यांचा प्रतिनिधी असलेला गाढव हा सुफलतेचा-समृद्धीचा दाता नसून तो निष्फळतेचा दरिद्रतेचा आणि अशुभाचा कारक आहे.’

याचा अर्थ दानपत्राचा भंग करणाऱयासाठी शापवाणी उच्चारणारा शासक केवळ स्त्राrची विटंबना करून थांबत नाही. तर एकप्रकारे त्या कुटुंबाला दारिद्रय़-अवकळा येईल, असंही सुतोवाच करतो. प्राचीन भारतीय वेदवाङ्मयात गाढवाचा- गदर्भ, रासभ, खर अशा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आलेला आहे. उज्जैन (उज्जयिनी) येथे आजही भरणारा गाढवांचा बाजार हा विक्रमादित्याच्या काळापासून (दोन हजार वर्षांपासून) भरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

गधेगाळ शब्द, गधेगाळ असलेल्या शिल्पाचं स्वरूप नि त्या शिल्पामागच्या विशिष्ट संकेताचा अर्थ जाणून घेतल्यावर या गधेगाळ का निर्माण झाल्या असतील, याचा शोध घ्यायला हवा. कदाचित याचं उत्तर मुस्लिमांच्या दक्षिण भारतावरील आक्रमणात असू शकतं. दहाव्या-बाराव्या शतकापासूनच मुस्लिमांनी दक्षिणेत उतरायला सुरुवात केली होती. परिणामी शिलाहार ते यादव राजवटीचा महाराष्ट्रातला सुवर्णकाळ कालवंडायला सुरुवात झाली होती. या काळात महाराष्ट्र मोठय़ाच सामाजिक-सांस्कृतिक संकटातून जात होता. हे संकट दुहेरी होतं. एकीकडे परकीयांचं आक्रमण आणि दुसरीकडे महाराष्ट्रात वाढत चाललेला ब्राह्मणी धर्मवाद. परकीय आक्रमक मंदिरांच्या ठायी एकवटलेली अर्थसत्ता उद्ध्वस्त करण्याच्या मागे होते, तर यादव काळात हेमाद्रीपंताच्या वर्चस्वामुळे ब्राह्मणीधर्म आक्रमक झाला होता. त्याच्या ‘चतुर्वर्ग’ चिंतामणी या ग्रंथामुळे तर ब्राह्मणी व्रतवैकल्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले. परिणामी  मंदिर संस्थांमध्ये त्यांचं प्राबल्य वाढलं होतं. सर्वसामान्य अशिक्षित जनता (संस्कृत येत नसलेली) आणि दुसरीकडे काही कारणाने मंदिर संस्था डळमळीत करणारे परकीय आक्रमक यांच्यासाठी निर्वाणीचा संदेश म्हणून या गधेगाळीचा प्रसार झाला असावा का?

म्हणजेच गधेगाळ असलेल्या शिलालेखांतून एकप्रकारे तत्कालीन समाजातील लोकरहाटीचं दस्तावेजीकरणही झालेलं दिसतं. महत्त्वाचं म्हणजे वीरगळ सापडण्याचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक असलं, तरी वीरगळावर शिल्पाबरोबर शिलालेख कोरण्याची प्रथा नसल्यामुळे तो वीरगळ कुठल्या वीराचा, त्या वीराला कधी आणि कुणाकडून मरण आलं किंवा अन्यही कुठल्या प्रकारची माहिती मिळत नाही. याउलट गधेगाळ कोरलेल्या शिळांमधून किमान तत्कालीन शासनकर्त्याची, राजसेवकांची, सर्वसामान्यांची माहिती मिळते. या अनुरोधाने गधेगाळ कोरलेल्या शिळांकडे पाहिलं, तर या शिळा समाज-संस्कृतीच्या वाहकच ठरतात. त्यांच्यावर आईवरून शिव्या कोरलेल्या आहेत आणि म्हणून त्या निषेधार्हच आहेत, पण एक सामाजिक-सांस्कृतिक दस्तावेज म्हणूनही त्याकडे पाहायला हवे!

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नितेश राणेंसारख्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी समज द्या – आमदार नायकवडी नितेश राणेंसारख्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी समज द्या – आमदार नायकवडी
बकरी ईदविषयी चुकीची आणि वादग्रस्त वक्तव्ये करून दोन समाजांत द्वेष पसरविण्याचे काम राज्यातील मंत्री नीतेश राणे यांच्याकडून सुरू आहे. राजकीय...
Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून
Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा
देवदर्शनावरून येताना सादळे-मादळे घाटामध्ये पत्नीचा खून, पळून गेलेला पती सोलापूर पोलिसांसमोर हजर; खुनाची दिली कबुली
कोलंबियामध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे यांच्यावर जीवघेणा हल्ला, 15 वर्षांच्या मुलाने डोक्यात गोळी झाडली
कल्याणमध्ये शिवसैनिकांचा घंटानाद; दुर्गाडीच्या पायथ्याशी जोरदार आंदोलन
अरे बापरे… मगरीचे पिल्लू घरात शिरले; महाडमधील घटना