रोखठोक – पराक्रम नक्की कोणी केला?

रोखठोक – पराक्रम नक्की कोणी केला?

‘ऑपरेशन सिंदूरकारवाईची माहिती जगाला कळविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशांत सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवून बहार आणली. रिगा, लातविया, अल्जेरिया, कोलंबिया, Sierra Leone, मोनरोविया, लाईबेरिया अशा देशांतदेखील भारतीय शिष्टमंडळे गेली व इकडे पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशात राजकीय प्रचारात दंग राहिले. त्यांच्या भक्तांनी लष्करी गणवेशातले मोदींचे फोटो वापरून राजकारण सुरू केले. भारतीय न्याय संहिता लष्करी गणवेशाच्या गैरवापरास परवानगी देत नाही!

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नेतृत्वाचा उडालेला गोंधळ चिंताजनक आहे. ‘‘पाकिस्तानला धडा शिकवला व आता पाकड्यांचे कंबरडे मोडले. पुन्हा अतिरेकी कारवाया वगैरे केल्या तर पाकिस्तानचे चार तुकडे करू’’ असे आपले पंतप्रधान व संरक्षणमंत्री भाषणांतून सांगत आहेत. तरीही पाकिस्तान त्यांच्या देशात युद्ध जिंकल्याचा विजय साजरा करीत आहे. पाकिस्तानचे भुक्कड पंतप्रधान शहाबाज शरीफ हे मोठ्या आत्मविश्वासाने जगात फिरत आहेत याचे गौडबंगाल काय? ते भारतीय जनतेला कळत नाही. भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगातील निवडक राष्ट्रांत पाठवली. या राष्ट्रांची व शिष्टमंडळाच्या नेत्यांची निवड ज्यांनी केली त्यांचा सत्कारच करावा लागेल. रिगा, लातविया, अल्जेरिया, कोलंबिया, Sierra Leone, लाटविया, बासिलिया, मोनरोविया, लाईबेरिया अशा देशांतही भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले. आफ्रिकेतील कांगो वगैरे ठिकाणीही गेले. या सर्व देशांचा भारत-पाकिस्तान संघर्षाशी संबंध आला असे वाटत नाही. यापैकी अनेक देशांची नावे भारतीयांनी प्रथमच ऐकली असावीत. रशिया, फ्रान्स, इजिप्त, बहरीन, युरोप, अमेरिकेतील देशांतही हे प्रतिनिधी मंडळ गेले. पण हे ‘महामंडळ’ या राष्ट्रांत जाऊन कोणाला भेटले? बहुतेक ठिकाणी तेथील विद्यमान सरकारांचे प्रमुख लोक भेटले नाहीत. देशांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्रीही भेटले नाहीत. काही देशांत माजी मंत्री व माजी खासदार भेटले असे समोर आले. कोलंबियात त्या देशाचे विदेश उपमंत्री रोसा योलांडा भेटले व त्यांना भारत देश किती सशक्त आहे हे सांगण्यात आले. 57 खासदारांनी विदेश दौरा केला. यातून देशाला नक्की काय मिळाले? ज्या देशांत हे सर्व महामंडळ गेले त्यातील किती देश भारताच्या बाजूने उभे राहिले? एकही नाही. भारताच्या अपयशी परराष्ट्र नीतीचे हे उदाहरण आहे.

सब पर भारी

‘एक अकेला सब पर भारी’ असे पंतप्रधान मोदींबाबत कालपर्यंत बोलले जात होते. मोदी यांनी आतापर्यंत 200 विदेश यात्रा केल्या. पूर्वीचे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर जात तेव्हा त्यांच्या विमानात देशाचे विदेश मंत्री, व्यापार मंत्री व इतर अधिकारी हमखास असतच. शिवाय सर्वपक्षीय खासदार व मीडियाचे पथक असे. पंतप्रधानांच्या विमानात संपूर्ण भारत वसलेला असे. मी स्वतः भारतीय पंतप्रधानांबरोबर विदेश दौऱ्यांचा अनुभव त्यांच्या विमानातून घेतला आहे, पण आपले सध्याचे पंतप्रधान इतक्या मोठ्या विशेष विमानांतून एकटेच जातात व येतात याचा अर्थ काय? पण पहलगाम हल्ल्यानंतर ते विदेशात भारताची बाजू मांडायला गेले नाहीत व 57 खासदारांना त्यांनी विविध देशांत सरकारची (भारताची नव्हे) बाजू मांडायला पाठवलं. पंतप्रधानांना ही उपरती ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झाली. असे काय घडले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी पंतप्रधानांना विरोधी पक्षाची मदत घ्यावी लागली. ‘एक अकेला सब पर भारी’ असताना 57 जणांचे शिष्टमंडळ विदेशात ‘जेवायला’ गेले होते काय? असे प्रश्न त्यामुळे अनेकांनी विचारले. पंतप्रधानांनी विरोधकांची विशेष संसद अधिवेशनाची मागणी स्वीकारली नाही. पण विरोधकांनी मागणी न केलेले खासदारांचे शिष्टमंडळ जगभ्रमणास पाठवले. यातील अनेक शिष्टमंडळांनी परदेशांत जाऊन गाण्या-बजावण्याचा सूर लावल्याचे व्हिडीओ समोर आले. 26 महिलांच्या कपाळावरचे ‘सिंदूर’ अतिरेक्यांनी पुसले. भारतावर दहशतवादी हल्ला झाला. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध लढा पुकारला आहे याची माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे शिष्टमंडळ जगात पाठवले. पण अशा गाण्या-बजावण्याच्या ‘व्हिडीओ’मुळे त्यातले गांभीर्य कमी झाले. एका देशात शिष्टमंडळ टेबलावर ‘चर्चा’ करीत आहे व भाजपच्या एक खासदार हिंदी सिनेमाचे गाणे गाऊन सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

झेलेन्स्कीचा मेगा शो

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदी हे ‘राजकीय रोड शो’ करीत आहेत आणि तिकडे त्याच वेळी युक्रेन, रशियातले युद्ध पुन्हा भडकले आहे. युक्रेनने रशियात 4000 किलोमीटर आत घुसून रशियाच्या विमानतळावरील 40 युद्ध विमाने उद्ध्वस्त केली. रशियाचे 40 हजार कोटींचे नुकसान केले. या पराक्रमाबद्दल झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या रस्त्यांवर ‘रोड शो’ केले नाहीत. युक्रेनसारखा एक मध्यम आकाराचा देश रशिया आणि पुतीनसारख्या महासत्तेशी झुंज देतोय व स्वाभिमान टिकवतोय. प्रे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा प्रस्तावही त्याने फेटाळून लावला. काय हे धैर्य! आणि इकडे प्रे. ट्रम्प यांनी एकतर्फी युद्धविरामाची घोषणा वाशिंग्टनमधून केली व त्यावर पंतप्रधान मोदी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. पण बिहारसह इतर राज्यांत मोदींचे लष्करी गणवेशातले फोटो, बानर्स, मोठी होर्डिंग्ज भाजपने झळकावून भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा अपमान केला. भारताच्या पंतप्रधानांना लष्करी गणवेशाचा वापर राजकीय लाभासाठी करण्याचा अधिकार कोणी दिला? लष्करी गणवेशाचा हा वापर बेकायदेशीर आहे व त्याबद्दल पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल होऊ शकतो. भारतीय न्याय संहिता, 168 कलमांतर्गत सरळ म्हटले आहे, जर एखादी व्यक्ती, जी सैनिक, नाविक, हवाई दलाचा सैनिक नसताना सैन्याचा गणवेश परिधान करते किंवा आपण सैनिक आहोत हे दर्शविण्यासाठी त्यासंदर्भातले कोणतेही चिन्ह, बिल्ला, पदके बाळगते, आपण भारतीय सैन्यदलाचा सदस्य असल्याचा गैरसमज निर्माण होण्याच्या हेतूने जर हे सर्व करीत असेल तर त्या व्यक्तीला तीन महिने कारावास, 2,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. हा कायदा भारतीय सैन्याचा, सैन्य गणवेशाचा, सैन्य चिन्हांचा सर्व प्रकारे गैरवापर रोखण्यासाठी बनवला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रतीकांचे पावित्र्य भंग होऊ नये व सैन्याचा सन्मान राखण्यासाठी हा कायदा बनवला. कश्मीर खोऱ्यांत भारतीय जवान व नागरिकांचे बलिदान झाल्यावर त्यांच्या नावाने ‘सैन्य वेशा’त मते मागणाऱयांना रोखण्यासाठी हा सैन्य सन्मान कायदा निर्माण झाला. मोदी व त्यांचे लोक या कायद्याचे सरळ उल्लंघन करीत आहेत!

पण प्रश्न विचारायचे कोणी? मोदी आधी प्रधान सेवक झाले. दहशतवाद्यांचे हल्ले झाल्यावर ते ब्रिगेडियर, कमांडर इन चीफ होऊ पाहत आहेत.

भारतीय सैन्याचा असा डोंबाऱयाचा खेळ करून राजकारणी काय साध्य करणार आहेत?

पराक्रम भारतीय सैन्याने केला आणि लष्करी गणवेशात पंतप्रधानांचे फोटो झळकत आहेत. हाच आहे अंधभक्त आणि मोदींचा नवा भारत!

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपने हायजॅक केली, चोरली, लुटली. राहुल गांधी सातत्याने हे सांगत आहेत आणि आम्हीही बोलतोय. महाराष्ट्रात भाजप आणि...
‘एचएसआरपी’ ला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद; 30 जून शेवटची तारीख, 16 जूनपासून इतर कामांना ब्रेक
Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’, रिंकू सिंहच्या साखरपुड्याचा मेन्यू व्हायरल
सर्जा-राजाच्या जोडीला लाखाचा भाव; वय कमी अन् ताकद जास्त
नितेश राणेंसारख्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी समज द्या – आमदार नायकवडी
Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून
Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा