देशाला हादरवणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे रहस्य उलगडणार मोठ्या पडद्यावर
काही महिन्यांपूर्वी राजा रघुवंशी याचे नाव जवळजवळ प्रत्येक वृत्तवाहिनीच्या मथळ्यांमध्ये होते. मे महिन्यात घडलेल्या या हत्याकांडांने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. याच हत्याकांडावर आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट चित्रपट बनवण्याच्या विचारात आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, आमिर खान यासंदर्भात सखोल अभ्यास करत आहे अशी माहिती आहे.
आमिर खान वर्षभरात कमी चित्रपट करतो, परंतु तो कथा निवडताना मात्र खूपच चोखंदळ असतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांकडून खूप वाहवा मिळवली होती. त्यामुळे सध्या आमिर खान एका नव्या कथेवर लक्ष केंद्रीत करुन आहे. आमिरबद्दल असे वृत्त आहे की, तो मेघालय हनिमून हत्याकांड प्रकरणावर एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट बनवणार आहे.
टाईम्स नाऊच्या सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, आमिर या खून प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्यात येणाऱ्या सर्व अपडेट्सवर लक्ष ठेवून आहे. असेही सांगितले जात आहे की, त्याने या संदर्भात त्याच्या जवळच्या व्यक्तींसोबतही वाच्यता केली आहे. राजा रघुवंशीवर चित्रपट बनवण्याची चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आमिर स्वतः या चित्रपटात भूमिका साकारणार की, फक्त या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
या प्रकरणाबाबत प्रोडक्शन हाऊस आणि आमिर खान यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. असेही म्हटले जात आहे की, आमिर त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट महाभारताच्या तयारीत व्यस्त आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List