दूषित अन्न-पाण्यामुळे काविळीचा धोका वाढतोय
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात कोरोनासह विषाणूजन्य आणि जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कॉलरा, अतिसार, विषमज्वर या आजारांसह हिपॅटायटीस अ (कावीळ) रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत असून, दूषित अन्नपाण्यामुळे हा आजार उद्भवत असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.
पुणे शहरासह राज्यभरात सध्या कोरोनासह डेंग्यू, चिकनगुणिया, स्वाईनफ्लू यासारख्या आजारांनी डोखेदुखी वाढवली आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांचे रुग्णही वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यामुळे सध्या टायफॉइड, कॉलरा, अतिसार, विषमज्वर आजारांसह कावीळ आजाराचे रुग्ण अधिक असल्याचे दिसून येत आहे. दूषित पाण्यामुळे हा आजार उद्भवत असल्याने सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे कावीळ आजाराचा धोका अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. काविळीची लागण झाल्यावर त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे, सातत्याने उलट्या मळमळ होणे, भूक न लागणे, ताप येणे, पोटदुखी, अपचन, जास्त प्रमाणात थकवा जाणवणे, स्नायू, सांधेदुखी, वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
राज्यभरात १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत ५१० जणांना काविळीची लागण झाली आहे. तसेच या आजारामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी राज्यभरात ८२७काविळीच्या रुग्णांची नोंद झाली होती. तर या आजारात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाच महिन्यांतच काविळीच्या रुग्णांची संख्या पाचशेच्या वर गेली आहे. तर मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या आजाराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कावीळ हा दूषित अन्न व पाण्यामुळे उद्भवणारा आजार आहे. पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण वाढीस लागतात. लहान मुलांमध्ये या आजाराचा धोका कमी असतो. मात्र, दहा ते बारा वर्षांपुढे मुले, थोर व्यक्तींना या आजारामुळे धोका होऊ शकतो. विशेषतः गर्भवती महिलांमध्ये या आजारामुळे गुंतागुंतीची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रमोद जोग, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List