कलातपस्वी – कलामहर्षी

कलातपस्वी – कलामहर्षी

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

भारतीय चित्रपटसृष्टी नुकतीच डोळे उघडू लागली होती त्या काळात (कै.) आनंदराव पेंटर आणि (कै.) कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी तिला आपल्या अभूतपूर्व प्रतिभेच्या जोरावर व अथक प्रयत्नाने घडविण्याचे, साजिवंत करण्याचे जे कार्य केले आहे, त्याला चित्रपट इतिहासात तोड नाही. देशी बनावटीचा कॅमेरा तयार करण्यापासून ते प्रकाशयोजना, नेपथ्य, कपडेपट, पोस्टर्स, शो कार्डस्, माहितीपत्रके, आभूषणे, ट्रिकसीन्स, अभिनय, कथा-पटकथा आदी सर्वच अंगांना (कै.) बाबूराव पेंटर यांनी स्वप्रज्ञेने जन्म दिला. 3 जून कलामहर्षी कै. बाबूराव पेंटर यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने…

चित्रपटसृष्टीत दृढमूल झालेले सर्व रीतिरिवाज ही बाबूराव पेंटर यांची निर्मिती आहे. त्यांनी त्या काळी उभे केलेले मानदंड शंभर वर्षे मागे पडली असतानाही चित्रपटसृष्टीत आजही दीपस्तंभ होऊन राहिले आहेत. कोल्हापूरच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विविध कला व कलाकारांना प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला.

राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापुरात नाटय़, संगीत, लोककला, चित्रकला, शिल्पकला आदी सर्वच कलेच्या क्षेत्रांत लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून येते. याचदरम्यान नव्याने उदयास आलेली चित्रपटकलादेखील कोल्हापुरात रुजली व फोफावली. कोल्हापूरच्या आनंदराव व बाबूराव या आते-मामे भावांना त्यांच्या ‘मेस्त्री’ या आडनावाने न ओळखता त्यांच्या चित्रकलेतील नैपुण्यामुळे ‘पेंटर’ बंधू म्हणूनच ओळखत असत. चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या दोघांनी घेतले नव्हते तरीही या दोघांनी चित्रकलेत स्वतःचा वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटविला. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ नाटकाचे पडदे रंगविण्याचे काम त्यांनी पैज लावून यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांनी चितारलेली पडद्यावरील दृश्ये ही इतकी हुबेहूब असत की, ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावेळी बाबूराव पेंटर यांच्या पडद्याला प्रथम टाळी पडे नंतर धैर्यधरचा रंगमंचावर प्रवेश होई. शिवराज नाटक मंडळींच्या ‘कृष्णकांचन’ नाटकाच्या गरीब ब्राह्मणाच्या घराचा पडदा त्यांनी अत्यंत हुबेहूब रंगविला होता. त्यांनी डेक्कन सिनेमा व महाराष्ट्र सिनेमा या थिएटर्सची केलेली सजावट असो किंवा मुंबई येथे फोटोग्राफीचा स्टुडिओ काढून केलेली फोटोग्राफी असो किंवा त्यांनी बनविलेली शिल्पे असोत, या कला माध्यमांचा पाया त्यांच्या अद्वित चित्रकलेत होता. त्यांच्या कुंचल्याच्या सफाईदार स्पर्शाने रंग व रंगछटा कोठे आणि कशा वळण घेतात ते कळत नसे.

बाबूराव पेंटर हे कलामहर्षी म्हणून विख्यात आहेत. 3 जून 1890 रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव बाबूराव कृष्णाजी मिस्त्री असे होते. त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करायचे. त्यामुळे कलेकडे उपजतच ओढा होता. काळासावळा रंग, रेखीव चेहरा, हातभर लांब पांढरीशुभ्र दाढी, उंच शरीरयष्टी असे त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते.

चित्रकला, शिल्पकला, चित्रपटकला आदी विविध कला क्षेत्रांत बाबूरावांनी नेत्रदीपक प्रगती केली अन् तीही कसलेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता केवळ निरीक्षण आणि सराव यांच्या माध्यमातून! चित्रकलेत त्यांनी स्वतःची शैली सिद्ध केली. विलक्षण कल्पनाशक्ती आणि अविरत प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी हे यश प्राप्त केले. नाटकांचे पडदे रंगवणे, नेपथ्य तयार करणे, चित्रपटांचे पोस्टर्स रंगवणे, कॅमेरा बनवणे, चित्रपट निर्मितीसह चित्रपटांचे दिग्दर्शन करणे ही सारी कामे त्यांनी जबाबदारीने आणि यशस्वीरीत्या सांभाळली. शिल्पकलेत ही अगदी मातीच्या मूर्तीपासून धातूच्या ओतीव कामांपर्यंत सर्वकाही ते स्वतःच जातीने करत असत. त्यांनी बनवलेले महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांचे पुतळे अप्रतिम आहेत.

आनंदराव पेंटर या आपल्या आतेभावाच्या संगतीत बाबूरावांना चित्रकला व छायाचित्रणाचा नाद लागला. गंधर्व नाटक मंडळीचे पडदे रंगविण्याचे काम बाबूराव करू लागले. नेपथ्यातील कलात्मक रंगीत पडद्यांमुळे बाबूरावांना कला क्षेत्रात मान्यता मिळू लागली. याचदरम्यान त्यांना दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट पाहण्याची संधी मिळाली. येथूनच त्यांना चित्रपट माध्यमांबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्याकाळी चित्रपटसृष्टी नुकतीच उदय पावू लागली होती. मूव्ही कॅमेरा आणि शूटिंग टेक्निक याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. आनंदराव पेंटर यांच्या मदतीने त्यांनी मूव्ही कॅमेरा तयार केला. दरम्यान आनंदरावांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ बाबूरावांनी 1917 साली ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

1919 मध्ये बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या वतीने ‘सैरंध्री’ हा त्यांचा पहिला मूकपट निर्माण केला. कल्पकता, भव्यता आणि राजवैभवाचे अपूर्व दर्शन ही या चित्रपटाची ठळक वैशिष्टय़े होती. 1920 ते 1930 या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकूण 17 चित्रपटांची निर्मिती केली. ‘सिंहगड‘ हा त्यांचा आर्क लाइटच्या प्रकाशात चित्रित केलेला पहिला चित्रपट मानला जातो. ‘सिंहगड‘, ‘सैरंध्री’, ‘वस्त्रहरण’, ‘कल्याणचा खजिना’, ‘सावकारी पाश’, ‘पद्मिनी’ हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. ‘सिंहगड‘, ‘कल्याणचा खजिना’ तसेच ‘पद्मिनी’ या मूकपटांना युरोपमधील चित्रपट महोत्सवात पारितोषिके मिळाली. बोलपटांचा जमाना सुरू झाल्यावर त्यांनी शालिनी सिनेटोनसाठी ‘उषा’, ‘सावकारी पाश’, ‘साध्वी मीराबाई’, ‘रामजोशी’, ‘रुक्मिणी स्वयंवर’ या बोलपटांचे दिग्दर्शन केले.

बाबूराव पेंटर म्हणजे अथक परिश्रमाने आणि कलात्मक अंगांनी जीवनाचा शोध घेणारे थोर संशोधक होत. चित्र, शिल्प, यंत्र, तंत्र या सर्व अंगांनी आपले घराणे त्यांनी प्रस्थापित केले.

आयुष्याच्या अखेरीपर्यंत कलानिर्मितीच्या विविध प्रयोगांत ते गढून गेले होते. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांनी केलेली कामगिरी पाहिली तरी बाबूराव कसे कलातपस्वी व कलामहर्षी होते हे समजून येते. कलेच्या अनेक क्षेत्रांमध्ये अभिनव कर्तृत्व गाजविणाऱ्या या स्वयंभू कलावंतांचे 16 जानेवारी 1954 रोजी निधन झाले. खऱ्या अर्थाने कोल्हापूरला ‘कलापूर’ म्हणून जी गौरवशाली उपाधी प्राप्त झाली त्यात कलामहर्षींच्या उच्च अभिजात कला कर्तृत्वाचा फार मोठा वाटा आहे, ‘कलापूर’च्या गौरवाचे बहुतांश श्रेय या तपस्वी कलामहर्षीकडे जाते. विसाव्या शतकात आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी महान कार्य करून ठेवले. अविचल निष्ठा, कठोर परिश्रम, प्रयत्नवादी व प्रतिभेच्या तपश्चर्येतून त्यांनी उच्च दर्जाची निर्मिती केली. त्यामुळे देश-विदेशातील कलाप्रेमींच्यात आजही त्यांच्याविषयी आत्मियता आहे.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र लोककलेचे अभ्यासक आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे  अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे....
खुशखबर ! मुंबई-कोकण आता अवघ्या चार तासात, कसं? मग ही बातमी वाचाच..
लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आता दुसऱ्यांदाही होणार आई, म्हणाली ‘आता आरामाची गरज…’
IPL मधून प्रिती झिंटा किती कमावते? तिची एकूण संपत्ती किती?
ही प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांची पूर्वपत्नी, ‘छावा’मधून जबरदस्त कमबॅक
‘आई तुळजाभवानी’चं कथानक अत्यंत रंजक वळणावर; सटवाई लिहिणार देवीचं भविष्य
बॅकलेस रेड ड्रेस अन् दिसला तो टॅटू, मलायकाच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!