Maharashtra Monsoon – कुठे पूर, कुठे वीज कोसळली तर कुठे संसार बुडाले; पहिल्याच पावसाने जनजीवन विस्कळीत
नियमित वेळेच्या 12 दिवस आधी दाखल होत मान्सूनने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद धक्का दिला. मात्र कालपासून मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे राज्यातील काही भागात जनजीवन विस्कळी झाले आहे. पावसामुळे कुठे पूर आला, शेतपिकं वाहून गेली तर कुठे वीज कोसळली, कुठे माणसं वाहून गेली. राज्यातील काही महत्वाच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे काही जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांना याचा फटका बसला. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने काही ठिकाणी लोकल सेवा विस्कळीत झाली तर काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मध्य रेल्वेवरील मस्जिद बंद रेल्वेस्थानकाला स्विमिंग पूलचे स्वरुप आले होते. पावसामुळे एक्सप्रेस वे वरील ट्रॅफिक जॅम झाले. वाहनांच्या लांब रांगा लागल्या. तर पहिल्याच पावसात वरळीतील अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात पाणी तुंबले.
पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले
आधी अवकाळी पावसाने आणि आता मान्सूनने पुणे जिल्ह्यात हाहाःकार माजवला आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात रविवारी मुसळधार पावसामुळे भिगवण-बारामती रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पूर आला. हे पुराचे पाणी वाडी-वस्त्यांमध्ये शिरल्याने अनेक संसार पाण्याखाली आले आहेत. मुसळधार पावसामुळे पाण्याच्या अतिदाबामुळे बारामतीत नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडले.
रस्तेही पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक शेतपिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पावसामुळे अंगावर भिंत कोसळल्याने सोमवारी 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर खेड तालुक्यातील रौंधळवाडी येथे मासेमारी करायला गेलेल्या युवकाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
रायगड-रत्नागिरीत रेड अलर्ट
रत्नागिरीत गेल्या मंगळवारपासून मुसळधार सुरु आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला आलेल्या पुरात राजेंद्र कोळंबे ही व्यक्ती वाहून गेली आहे. दापोली पोलीस प्रशासन, महसूल विभाग, गावकरी नदीपात्रात शोध घेत आहेत.
रायगडमध्येही पावसाने हाहाःकार माजवला आहे. किल्ले रायगड मार्गावरील कोंझर घाटातील धबधब्यातील पाण्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरात बायपास मार्ग खचला. श्रीवर्धनमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List