नोंद – डॉ. बाबा आढाव – अखंड संघर्षयात्री

नोंद – डॉ. बाबा आढाव – अखंड संघर्षयात्री

>> अॅड. दत्ता काळेबेरे

कष्टकऱयांचे नेते म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले ज्येष्ठ समाजवादी डॉ. बाबा आढाव यांचा 1 जून रोजी 95 वाढदिवस. कागद, काच, पत्रा गोळा करणाऱया अंगमेहनती तसेच कष्टकरी वर्गासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी स्थापन केलेल्या टेम्पो पंचायत, हमाल पंचायत, हमाल, माथाडी या संस्था, तसेच शेतकरी, प्रकल्पग्रस्त,धरणग्रस्तांसाठी डॉ.आढाव यांची लढाई या वयातदेखील अखंडपणे सुरू आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनातील वाटचालीचा हा मागोवा घेतला आहे.

डॉ. बाबा आढाव 1 जून रोजी वयाची 95 वर्षे पूर्ण करून 96 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या वयातही बाबा गरिबांसाठी, कष्टकऱयांसाठी आणि ‘नाही रे’ वर्गासाठी अविरतपणे संघर्षशील आहेत. गेली सात दशके बाबांनी अनेक आंदोलने केली. विधायक व रचनात्मक कामांचा मानदंड निर्माण केला. विविध संस्थाची उभारणी केली. ध्येयवादी कार्यकर्त्यांचा संच जमविला. बाबांच्या चळवळींचा- वाटचालींचा गेली पंचावन्न वर्षांचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सहकारी आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर ओझरता-धावता दृष्टिक्षेप टाकला तरी मन स्तिमित होते.

बाबांचे प्राथमिक शिक्षण पुणे नगरपालिकेच्या विद्यालयात आणि माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले. सन 1953 मध्ये आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी मिश्र वैद्यक शास्त्राची पदवी घेतली. काही वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला. गरीब रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र आरोग्य मंडळ या विश्वस्त संस्थेची स्थापना करून व्यक्तिगत वैद्यकीय व्यवसायाचे सामाजिकरण केले. त्याचेच रूपांतर सानेगुरुजी रुग्णालयात झाले. 1966 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. व्यक्तीगत रुग्णोपचार करण्याऐवजी भारतीय समाजपुरुषाला जडलेल्या विविध व्याधींवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी बाबांनी स्वतःला पूर्णत्वाने समर्पित केले. स्त्राr, दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, अल्पसंख्याक, हमाल, कष्टकरी, अपंग, धरणग्रस्त इत्यादी उपेक्षित व शोषित जनसमूह हे डॉ. बाबा आढाव यांचे कार्यक्षेत्र आहे. लोकशाही, समाजवाद, इहवाद विज्ञाननिष्ठ समाजाची प्रस्थापना करण्यासाठी अहर्निश कृतिप्रवण राहणे हा त्यांचा ध्येयवाद आहे.

बाबांची वैचारिक जडणघडण राष्ट्रसेवा दलात झाली. आपल्या आयुष्यातील पहिला सत्याग्रह 1952 साली अन्नधान्य भाववाढ विरोधात केला. त्यानंतर त्यांचे कायमचे तुरुंगाशी नाते जडले. कारावासाचे ‘अर्धशतक’ त्यांनी केव्हाच पूर्ण केले आहे. गोवामुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते अग्रभागी होते. पुण्यात झोपडीवासीयांसाठी ‘झोपडी संघ’ स्थापन केला, आणीबाणीमध्ये प्रचंड मेळावा घेतला परिणामतः मिसाखाली 16 महिन्यांचा कारावास झाला. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषदेची स्थापना केली. विविध आंदोलने केली. धरण व प्रकल्पग्रस्तांना विकसनशील पुनर्वसनाचा कायदेशीर हक्क मिळाला. तथापी कुकडी धरणग्रस्तांच्या सत्यागृहात पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये बाबांना एक डोळा गमवावा लागला.

सन 1955 मध्ये त्यांनी हमाल पंचायतची स्थापना केली. हमाल पंचायत हा बाबांच्या कार्याचा व चळवळीचा केंद्रबिंदू आहे. हमाल माथाडी कायदा 1969 साली अस्तित्वात आला हमालांना भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युएटी, बोनस मिळू लागला. पुण्यात हमाल भवन उभारले. हमाल पंचायत कष्टाच्या भाकरीमुळे स्वच्छ, सकस अन्न कष्टकऱयांना अल्पदरात मिळू लागले. ‘हमालनगर’ ही पाचशे सदनिकांची वसाहत साकार केली. कष्टकरी विद्यालयाची स्थापना करून प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण देऊन कष्टकऱयांच्या नव्या पिढीला उज्ज्वल भविष्याची ग्वाही दिली.

सन 1955 ते 1972 या कालखंडात प्रजा समाजवादी समाजवादी पक्षातर्फे एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य यांच्या समवेत विविध चळवळी, आंदालने, संघर्ष केले. दोन वेळा पुणे मनपाचे नगरसेवक झाले आणि लोकसभेच्या निवडणुकीत पराभूतही झाले. त्यानंतर सक्रिय राजकारणाचा संन्यास घेतला.

महात्मा फुले समता प्रतिष्ठानची 1971 साली स्थापना केली. तत्कालीन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘एक गाव एक पाणवठा’ मोहीम चालू केली. या चळवळीमध्ये आलेले अनुभवन ‘एक गाव एक पाणवठा’ या मौज प्रकाशित ग्रंथात कथन केले. या चळवळीचे फलस्वरूप म्हणजे महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांमध्ये दलित-सवर्णांचे पाणवठे एक झाले.

‘एक मत समान पत’ ही मोहीम गावागावात रुजविली आणि कष्टकऱयांना समता व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. बाबांनी सन 1974 सालापासून देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसनासाठी आंदोलने केली. महाराष्ट्र सरकारने देवदासी पुनर्वसन आयोग नेमला. देवदासी कायद्यात दुरुस्ती केली. वृध्द देवदासींना पेन्शन योजना सुरू केली.

मराठवाडा विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी बाबांनी पुणे ते औरंगाबाद ‘लाँगमार्च’ काढला. 6 डिसेंबर 1979 ला प्रचंड सत्याग्रह झाला. नामांतराचे स्वप्न साकार झाले.

पुण्याच्या राष्ट्रीय एकात्मता समितीचे बाब संस्थापक आहेत. मुस्लीम प्रबोधनाच्या चळवळींना बाबांनी कृतिशील साथ दिली. पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिली राष्ट्रीय एकात्मतता परिषद झाली. भिवंडी दंगलीनंतर बाबांनी दीड लक्ष रुपयांचा निधी दंगलग्रस्तांना मिळवून दिला. गुजरात दंगल, ओरिसाचे वादळग्रस्त, मराठवाडय़ातील भूकंपग्रस्त इत्यादी आपत्तीग्रस्तांना भरीव आर्थिक व वैद्यकीय सहाय्य मिळविण्यासाठी बाबांनी जिवाचे रान केले.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या दिंडय़ामधील अस्पृश्यतेविरुध्द आळंदी येथे यशस्वी सत्याग्रह केला. जयपूर उच्च न्यायालयासमोरील मनुचा पुतळा हटविण्यासाठी महाड ते जयपुर पदयात्रा काढली. महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी संस्था व संघटनांना विषमता निर्मूलन समितीच्या व्यासपीठावर एकत्र आणून बाबांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना गती दिली.

महाराष्ट्रात संसदबाहय़ कार्य करणाऱया ध्येयवादी कार्यकर्त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची उभारणी केली. पुण्यातील पन्नास हजार रिक्षाचालक, मालकांना संघटित करून ‘रिक्षा पंचायतची’ स्थापना केली व त्यांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्यात आला.

कागद, काचपत्रा वेचणारे, बांधकाम मजूर, पथारीवाले, अंग मेहनती कष्टकरी, मोलकरीण, इ. कष्टकऱयांसाठी बाबा सातत्याने संघर्ष करतात. असंघटित कष्टकऱयांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा करावा यासाठी बाबांनी विविध प्रांतामध्ये व राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड परिषदा, सत्याग्रह, आंदोलने केली. संसदेने सामाजिक सुरक्षा विधेयक मंजूर केले आहे. 37 कोटी कष्टकऱयांना या कायद्याचा लाभ मिळणार आहे. सदर कायद्याची अंमलबजावणी करणेबाबत केंद्र सरकार चालढकल करीत आहे.

बाबांचा चळवळ, आंदोलन, सत्याग्रह, उपोषण संघर्षावर विश्वास आहे. तितकाच, संवाद, प्रबोधन व रचनेवर ठाम विश्वास आहे. उपोषण हे बाबांचे आत्मक्लेशाचे अंतिम हत्यार असते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्षाने ई.व्ही.एम. मशीन व मतदार यादीमध्ये घोटाळा करून विजय प्राप्त केल्याची जनमानसात तीव्र भावना आहे. निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ जनजागृतीसाठी बाबांनी म. फुले यांच्या स्मारकामध्ये तीन दिवसाचे ‘आत्मक्लेश उपोषण’ केले. या आंदोलनामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत या नेत्यांसह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते.

आज बाबा शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आयुष्यभर ध्येयवादी, त्यागी वृत्तीने केलेल्या कार्याला लोकमान्यता, राजमान्यता, मिळाली आहे. त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.

बाबांचे कौटुंबिक जीवन अत्यंत आनंदाचे आहे. बाबांच्या पत्नी शीलाताई सेवानिवृत्त झाल्या आहेत. असीम व अंबर ही दोन्ही मुले अभियंता आहेत. या वयातही बाबांचा दिवस उजाडतो आणि मावळतो कोणत्या तरी चळवळ, आंदोलन, उपोषण, सत्याग्रहाने असे हे अखंड संघर्षयात्री आहेत!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे  अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे....
खुशखबर ! मुंबई-कोकण आता अवघ्या चार तासात, कसं? मग ही बातमी वाचाच..
लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आता दुसऱ्यांदाही होणार आई, म्हणाली ‘आता आरामाची गरज…’
IPL मधून प्रिती झिंटा किती कमावते? तिची एकूण संपत्ती किती?
ही प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांची पूर्वपत्नी, ‘छावा’मधून जबरदस्त कमबॅक
‘आई तुळजाभवानी’चं कथानक अत्यंत रंजक वळणावर; सटवाई लिहिणार देवीचं भविष्य
बॅकलेस रेड ड्रेस अन् दिसला तो टॅटू, मलायकाच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!