सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. स्पर्धक कंपनीपेक्षा 3 हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम देणे, शालार्थ आयडी घोटाळ्यावर पांघरूण घालणे यावरून सरकारला खडे बोल सुनावतानाच शेतकरी आत्महत्यांसह अनेक प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अनेक विभागात भ्रष्टचार वाढला आहे. प्रचारात स्वच्छ प्रशासन म्हणतात मात्र दररोज घोटाळे बाहेर येतात. सत्ताधारी मंत्री भ्रष्टाचार करत असताना काय करणार. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारला अपयश आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारमधील मंत्र्यांचे समोर आलेल्या विविध घोटाळ्यांबाबत दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारच्या विविध खात्यात भ्रष्टाचार बोकाळलेला असून मंत्री कमिशन शिवाय कोणतं काम करत नसल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला. राज्यात शेतकऱ्यांचे हाल सुरू असून महिला भगिनींवर अन्याय आत्याचाराच्या घटना घडत असताना याबद्दल सरकारने मौन धारण केले असून फक्त कंत्राट मिळवण्यात त्यांना रस असल्याची टीका दानवे यांनी केली. सत्ताधारी पक्षातील लोकं अनेक गुन्ह्यात सहभागी असून महिला अत्याचारातही सत्ताधारी पुढे आहेत. राज्यात गुत्तेदार आणि दरोडेखोर यांचे राज्य आले असून कोणत्याच गुन्हेगारांवर कारवाई होत नसून कायद्याचे पालन होत नसल्याबाबत दानवे यांनी गृह खात्यावर ताशेरे ओढले. मागील पाच महिन्यात 1 लाख 60 हजार गुन्हे राज्यात घडले, 924 हत्या झाल्या असून दररोज 6 हत्या होतात. तर 3 हजार 506 बलात्कार झाले. या घटनांमध्ये जवळचे लोकं एवढे हिंमत का करतात? असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात 10 हजार 400 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे अनेक मोठे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र 10 व्या क्रमांकावर आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रीय असून भाईगिरी सुरू आहे. पुण्यात सर्वात जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून एका अधिकाऱ्याची 92 लाख रुपयांची फसवणूक झाली. सरकारने पोलीस भरतीचे फक्त आश्वासन दिले मात्र त्यावर अंमलबजावणी केली नसल्याचे दानवे म्हणाले. अल्पवयीन मुलं, महिला अत्याचार, घरगुती अत्याचार यांचे प्रमाण 4 हजार 336 इतके वाढले. वैष्णवी हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्ष यांनी हुंड्यासाठी छळ करून हत्या केली. सत्ताधारी मंडळी गुन्हे करतात हे अत्यंत निंदनीय असल्याची टीका दानवे यांनी केली.
मस्साजोग घटनेतील फरार आरोपी, बीड जिल्ह्यातील 17 वर्षीय मुलीवर झालेला छळ, जिल्हा परिषद येथे 30 महिलांचा झालेला छळ, अमली पदार्थांचे खेड्यापाड्यात वाढत असलेले प्रमाण, ठाणे-मुंबई-पनवेल ते भिवंडी परिसरात परमिट रूमच्या माध्यमातून सुरू असलेले ड्रग्सचे धंदे यावर दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. छत्रपती संभाजीनगर येथे कीर्तनकार महिलेची दगडाने हत्या करण्यात आली. पनवेल भागातील गुन्ह्यांमध्ये पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी असून शासन याकडे गांभीर्याने बघत नाही. राज्यात पोलिस संरक्षणाखाली अवैध व्यवसाय मोठया प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करत गृहविभागावर दानवे यांनी जोरदार टीका केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List