Rain Alert : राज्याला अवकाळी दणका, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा जोर कायम
राज्यातील 23 जिल्ह्यांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात मान्सूपूर्व पावसाने दाणादाण उडवली. अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक झाडं उन्मळून पडली. अवकाळीने अनेक भागांना झोडपून काढले. अनेक शहरात, गावात धो धो पाऊस बरसला. तर वीज पडल्याने मनुष्यहानी आणि पशूहानी झाली. मराठवाड्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसासह वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. शहरातही अनेक तास वीज गूल झाली. अवघ्या एका तासाच्या पावसाने पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी साचले. तर अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाड्याला अवकाळीचा दणका
सोमवारी सायंकाळी मराठवाड्यात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. गेल्या आठवडाभरापासून मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडाली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला.
जालना जिल्ह्यातल्या विविध भागात अवकाळी पावसाने काल सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावत शेतकर्यांची दाणादाण उडवून दिली. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं. जाफराबाद तालुक्यातील बेलोरा गावालगत असलेल्या एका गाईच्या गोठ्यावर वीज पडल्याने गोठ्यात असलेल्या गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने या शेतकऱ्याचा मोठा नुकसान झालं. दरम्यान पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने शेती कामांना आता ब्रेक लागला आहे. तर दुसरीकडे राजुर शहरालगत असलेल्या डोणगाव येथे एका शेतकर्याचे 2 बैल आणि 1 गाय या जनावरांचा वीज पडून मृत्यू झालाय. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम कायम असल्याने नागरिकांच्या फळबागाचं देखील मोठं नुकसान झाले आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होईल. या पट्ट्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मान्सूनपूर्वी शेतीची मशागत खोळंबली आहे. पण यामुळे रान आबादानी झाले आहे.
नाशिकला यलो अलर्ट
नाशिकसाठी पावसाचा दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिकला २२ मे आणि २३ मे रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ ते २५ मे दरम्यान राज्यात पावसाचा जोर असल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर महाराष्ट्राला सु्द्धा पावसाने झोडपले आहे. मनमाड रेल्वे स्टेशनवर गळती दिसून आली. तर जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने मोठा दणका दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List