टेरर आणि क्रिकेट कोण एकत्र करत आहे, हे चालते का? संजय राऊत यांचा भाजपला सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला आहे. टेरर आणि क्रिकेट एकत्र येणे, हे भाजपला चालते का, असा परखड सवालही त्यांनी केला आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांना हे कसे चालते, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
टेरर आणि ट्रेड, टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. दहशतवाद आणि व्यापार, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे ते म्हणत होते. तर मग आता टेरर आणि क्रिकेट म्हणजेच दहशतवाद आणि क्रिकेट भाजप एकत्र का करत आहे, असा सवालही त्यांनी केला. अमित शहांचा मुलगा दहशतवाद्यासोबत क्रिकेट एकत्र आणत आहे, हे भाजपला चालते का, असा सवालही त्यांनी केला. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांना हे चालते का, असा सवालही त्यांनी केला. हिंदुत्ववादाचा नारा देणाऱ्यांना आता टेरर आणि क्रिकेट चालते का,असा सवाल करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सातत्याने हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा दावा करत आहे. यातून सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश दिसून येत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीन पाकिस्तानसोबत ठामपणे उभा होता. यातूनही परराष्ट्र धोरणाचे अपयश दिसून येते. आपले पराराष्ट्र धोरण योग्य असते, तर अशा गोष्टी झाल्याच नसत्या, असेही राऊत यांनी ठणकावले.
ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव देशात दिसला नाही. आता जनतेलाही माहिती आहे की, भाजप गंडवत आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची तुलना राज्यातील त्यांच्या विजयासोबत करावी लागेल. भाजपने राज्यात विजय मिळवला, त्याचा विजयोत्सव कुठे दिसला का,यावरून या दोन्ही गोष्टीमध्ये लंफगेगिरी झाल्याचे दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List