विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या मुंबईतील सर्व आमदारांना सोबत घेऊन गेले होते. प्रकल्पाच्या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ‘गणपतीआधी बीडीडीतील रहिवाशांना घराच्या चाव्या द्या’, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
आज बीडीडीचा पुनर्विकासाची पाहणी करायला मी शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांना व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना इथे आमंत्रित केलं होतं. बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, रहिवाशांना कधीही चावी मिळू शकते. गणपती नवीन घरात साजरा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. माझी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती आहे की गणपती आधी रहिवाशांना घराच्या चाव्या द्या. याच्यात मला कुठेही राजकारण करायचं नाहीय. आनंदात सर्वांचा गृहप्रवेश व्हायला हवा. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”माझे आजोब हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की मराठी माणसाला मुंबईतदर्जेदार घरं मिळावी. वरळीत बीडीडी चाळीच्या आजुबाजुला पॉश इमारती उभ्या होत आहेत. तशाच पॉश इमारती या पुनर्विकासात म्हाडाने बांधल्या आहेत. आमचं सरकार असताना 1 ऑगस्ट 2021 ला हे काम सुरू झालं होतं. वरळीतील पहिला टप्प्यातील ई आणि डी बिल्डिंग तयार झाल्या आहेत. पुढचे टप्पेही सुरू झाले आहेत. दर महिन्याला आम्ही पाहणी करतोय व जे काही अडचणी असतेय त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. जेवढं काही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं आहे”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पत्रकारांनी पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी मारले गेल्याचा दावा गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारताच ते म्हणाले की, ” महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ते अतिरेकी आले कुठून, गेले कुठे, भाजपमध्ये प्रवेश केला का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहात, मग बीसीसीआय काय पंडीत नेहरू चालवतात का? आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल
युती जपावी की इमेज हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं
”मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी युतीतील लोकांना जपावं की स्वत:च्या इमेजला जपाव हे ठरवावं. स्वच्छ शासन करायचं असेल तर चड्डी बनियन वाले, डान्स बार चालवणारे राज्य गृहमंत्री असतील असं चालेल का? हा विचार करून त्यांनी पुढची कारवाई करावी. युती धर्म त्यांच्या चांगलं काम करण्याच्या मध्ये येत आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List