शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा
राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी राज्यात पहिले आले. विशेष म्हणजे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातील राज्य गुणवत्ता यादीतील कोल्हापूर जिल्ह्यातील 27 पैकी 24 विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेतील आहेत. जिल्हांतर्गत कट ऑफमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसरा आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी राज्यापेक्षा अधिक आहे. शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेच्या राज्याच्या निकालाची टक्केवारी 23.90 आहे. कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी 36.10 टक्के आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या निकालाची टक्केवारी 19.30 टक्के आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी 35.85 टक्के आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेतील आपला लौकिक कायम राखला आहे
राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्य गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर सोनाली येथील ईश्वरी दिग्विजय कोटकरने 294 गुण प्राप्त करत पहिला क्रमांक मिळवला. केंद्र शाळा फेजिवडे येथील सौरभी सूर्यकांत डवर दुसरी, तर विठ्ठल विद्या मंदिर पेद्रेवाडी येथील श्लोक शशिकांत पाटील आणि भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर सोनाळी येथील स्वरा आदर्श साबळे यांनी तिसरा क्रमांक मिळवला. राज्य गुणवत्ता यादीमध्ये केंद्र शाळा, पिंपळगाव येथील आदित्य दिगंबर मिसाळ व मराठी विद्या मंदिर माडवळे येथील विद्यार्थी शिरीष मनोहर मसुरकर यांनी सहावा क्रमांक पटकावला आहे.
शहरी विभागात इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर येथील विद्यार्थिनी स्वरा अरुण पाटील व अद्वैत दिलीप पोवार यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे. जरग विद्यामंदिराचे विद्यार्थी संस्कार शहाजी पाटील व मधुरिमा भरत कुमार जाधव यांनी प्रत्येकी 284 गुण मिळवत सहाव्या क्रमांकावर आहेत. कागल येथील शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी श्लोक संदीप भारमल हा 282 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा शहरी विभागात राज्य गुणवत्ता यादीमध्ये आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी सौश्रुती अमित पुंडपळ हिने 290 गुण मिळवत राज्यात दुसरी, इचलकरंजी डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूलमधील श्वेतल सुनील बंडगर, व्यंकटराव हायस्कूल आजरा येथील विवेक धनाजी पाटील व व्यंकटराव हायस्कूल आजरा येथील स्वराज प्रवीण निंबाळकर यांनी प्रत्येकी 280 गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत आठव्या स्थानावर आहेत. इचलकरंजी येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी संस्कृती संतोष आवळे हिने 278 गुण घेऊन दहाव्या क्रमांकावर आहे.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात राज्य गुणवत्ता यादीमध्ये राधानगरी तालुक्यातील श्री नामदेवराव भोईटे विद्यालय कसबा वाळवा येथील विद्यार्थिनी नुपूर युवराज पवार हिने 288 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. पुष्पनगर कुमार भवन येथील पार्थ चंद्रकांत पाटील तिसऱ्या, तर छत्रपती शिवाजी हायस्कूल पन्हाळा येथील विद्यार्थिनी अंजली बाबासा पाटील चौथ्या क्रमांकावर आहे. तिरवडे येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी यश लक्ष्मण पाटील व कुमारभवन पुष्पनगर पार्थ बजरंग व्हरकट सातव्या स्थानावर आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List