देवाभाऊ, शेजारी काय परिस्थिती आहे, जरा बघा! शेतकऱ्यांच्या समस्यांवरून शरद पवार यांनी फडणवीसांना सुनावले
नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासांठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्यातील शेतकरी संकटात असून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचा समाना त्यांना करावा लागत आहे. सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याचे काहीही झाले नाही. गेल्या दोन महिन्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे गंभीर असल्याचे पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून गेल्या दोन महिन्यात राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला. आता सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. महविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्यातील शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारीच आहे, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
शेतकरी समस्यांबाबत सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, पण आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. नाशिकमधील मोर्चा ही सुरूवात आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण जास्त असून कर्जाबाजारीपणामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख करत देवाभाऊ, शेजारी काय परिस्थिती आहे, जरा बघा, असे सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
नाशिक शहरात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चाच्या मुख्य मागण्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करणे, कर्जमाफी आणि शेतीमालाचे हमीभाव यांचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाला लक्षात घेऊन, कर्जमाफीची मागणी जोरदारपणे करण्यात आली. मोर्चाद्वारे सरकारचे लक्ष या गंभीर समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही – सुप्रिया सुळे यांचा निशाणा
आजच्या मोर्चानंतर प्रत्येक जिल्ह्यात सरकारला शांततेत निवेदन द्या, जिल्हाधिकारी यांच्याकडे कर्जमाफीसाठी निवेदन द्या. सरकारकडे 7/12 कोरा करण्याची मागणी करा, जर एका महिन्यात सरकारने आश्वासन पाळले नाही तर सरकारला खाली खेचू, मंत्र्याना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List