‘ठाकरे अन् पवारांचे सहा दशकांचे प्रेम’, राज-उद्धवबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ठाकरे आणि पवारांचे सहा दशकांचे प्रेमाचे संबंध आहेत. त्यांनी टोकाची राजकीय भूमिकासुद्धा घेतलेली आहे. परंतु कौटुंबिक संबंध दोन्ही बाजूने जपले गेले आहेत. ते संस्कार आमच्यावर झालेले आहेत. उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही मला भावासमान आहेत. ते दोघे एकत्र येत असतील, महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेही मानाचा मोठेपणा दाखवत असतील, तर हे कौतुकास्पद आहे. एखादे कुटुंब एकत्र येत असेल आणि राज्याचे चांगले होणार असेल कोणताही व्यक्ती त्याचे स्वागत करेल. मतभेद हे असले पाहिजे, मात्र मनभेद असू नये. राज आणि उद्धव दोन्ही माझ्याहून मोठे आहेत. त्यामुळे मी त्यांना कसा सल्ला देणार? असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आज महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, शिक्षण, शेतकरी, पाणी या विषयांवर गांभीर्याने विचार करायला हवा. सरकारकडून माझ्या अपेक्षा नाही. सगळ्या महिलांच्या अश्रूवर या सरकारचा महाल उभा आहे. त्यामुळे कोणीतरी त्यांना जाब विचारल पाहिजे. त्याची जबाबदारी आपल्यावरही आहे. कारण लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. पक्षावर विश्वात दाखवला आहे. जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा मी करणार आहे.
जातीय जनगणनाची मागणी आपण केली होती. ती उशिरा का होईना केंद्र सरकारने मान्य केली. त्याचे मी मनापासून स्वागत करते, असे सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसदेत महिला आरक्षणाच्या बिल आम्ही संमत केले आहे. सर्व गोष्टी 2025- 26 पर्यंत पूर्ण करण्याची गरज आहे. 2029 मधील लोकसभा निवडणुकीसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. आता महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मे महिन्यात वन नेशन वन इलेक्शनसह इन्कम टॅक्स नवीन कायदा होत आहे. या दोन्ही समितीवर मला काम करण्याची संधी मिळाली आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कोणतीही विरोधी भूमिका घेणार नाही. आम्ही सरकारला याबाबत शब्द दिला आहे. टीका करायला भरपूर संधी आहे. संसदेत या विषयावर ताकदीने बोलेल. पण आता आठ ते दहा दिवस अत्यंत जपून व्यक्त करणार आहे. संसदेत सर्व पक्षांना एकत्र बोलवा. त्यानंतर जगाला आम्ही एक आहोत, असा संदेश देण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List