Maharashtra Monsoon Session 2025 : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी गदारोळ; विरोधकांचा सभात्याग
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात मोठा गोंधळ पहायला मिळाला. विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तसेच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या अपमानजनक वक्तव्यांवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. याच दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे गेले आणि राजदंडाला स्पर्श केल्याने त्यांच्यावर एका दिवसासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी सभात्याग करत दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांवरील कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी पुरेशी मदत आणि शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी नाना पटोले यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित केला. यात कोकाटे यांनी कर्जमाफीबाबत केलेले वक्तव्य आणि लोणीकर यांनी शेतकऱ्यांना अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावरून सभागृहात तणाव वाढला.
सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करताना नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाकडे जात राजदंडाला हात लावला. यावरूनच नार्वेकर यांनी पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईवर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सभात्याग केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List