लातूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी 986.3 टक्के पाऊस; बॅरेजेस सोडले पाणी
मागील अनेक वर्षानंतर यावर्षी प्रथमच मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी 19.7 मि.मी. पाऊस होत असतो. पण यावर्षी तब्बल 194.3 मि.मी. इतका सरासरी पाऊस पडला आहे. टक्केवारीचा विचार केला तर तब्बल 986.3 टक्के सरासरी अधिक पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यातून बॅरेजेस मधून प्रथमच मे महिन्यात नदीपात्रात पाणी सोडावे लागले. लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या मांजरा प्रकल्पात मंगळवारी केवळ 19.87 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर निम्न तेरणा प्रकल्पात 47.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मे महिन्यात लातूर जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल 12 दिवस पाऊस झालेला आहे.
मराठवाड्यातील लातूर हा तसा कायम दुष्काळी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दर तीन वर्षांनी या भागामध्ये पाण्याचा दुष्काळ पडतो. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. मागील अनेक वर्षाच्या कालावधीत या वर्षी प्रथमच मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर जिल्ह्यात लवकर पाऊस झाल्यानंतर जून, जुलै मध्ये पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. सध्या पाऊस पडत असतानाही सर्वांच्या मनात त्याचीच चिंता अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मे महिन्यात लातूर जिल्ह्यात 19.7 टक्के सरासरी पाऊस होत असतो. त्यामध्ये लातूर तालुका 21 मि.मी., औसा तालुका 22 मि.मी., अहमदपूर तालुका 16.8 मि.मी., निलंगा तालुका 20.4 मि.मी, उदगीर तालुका 22 मि.मी., चाकूर तालुका 26.5 मि.मी., रेणापूर तालुका 202.2 मि.मी., देवणी तालुका 14.6 मि.मी., शिरूर अनंतपाळ तालुका 5.5 मि.मी. तर जळकोट तालुक्यात 6.8 मि.मी. पाऊस होत असतो. यावर्षी मात्र लातूर तालुक्यात 199.3 मि.मी., औसा तालुका 189.8 मि.मी., अहमदपूर तालुका 152.01 मि.मी., निलंगा तालुका 199 मि.मी, उदगीर तालुका 210.9 मि.मी., चाकूर तालुका 190.7 मि.मी., रेणापूर तालुका 175.09 मि.मी., देवणी तालुका 269.7 मि.मी., शिरूर अनंतपाळ तालुका 196.1 मि.मी. तर जळकोट तालुक्यात 170.6 मि.मी. पाऊस झालेला आहे.
लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात आज रोजी 19.87 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्प माकणी येथील प्रकल्पात 47.55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात 5.90 टक्के, रेणापूर मध्यम प्रकल्पात 25.40 टक्के, व्हटी मध्यम प्रकल्पात 10.52 टक्के, तिरू मध्यम प्रकल्पात 5.17टक्के, देवर्जन मध्यम प्रकल्पात 5.24 टक्के, साकोळ मध्यम प्रकल्पात 16.71 टक्के, घरणी मध्यम प्रकल्पात 27.85 टक्के तर मसलगा मध्यम प्रकल्पात 0.07 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 134 लघू पाटबंधारे प्रकल्पात 15.13 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
रेणा नदीवरील रेणापूर बॅरेज मधून 0.057 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत एकूण 2.534 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. खरोळा बॅरेज मधून 0.216 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असून, आजपर्यंत एकूण 6.642 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे. तेरणा नदीवरील सोनखेड बॅरेज मधून आजपर्यंत 13.700 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलेले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List