एकनाथ शिंदे लुटारुंच्या टोळीचे मुखिया, अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करा – हर्षवर्धन सपकाळ
भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिणीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे ? असा संतप्त सवाल करून या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधा-यांनी घेतले आहे, त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते का? या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारण चमकवण्यात जास्त रस असल्याने राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडत आहेत, आम्ही आयोगाचा धिक्कार करतो.
राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीएकडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कमटॅक्स कडून चौकशी करावी असे सपकाळ म्हणाले.
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हजारो लाखो होक्टवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना याचा मोठा फटका बसला आहे पण सरकारकडून मदत देणे दूरच साधे पंचनामे ही केले जात नाहीत. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बोगस बियाणे आणि खतांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. बियाणे आणि खतांची लिंकींग करून विक्रेत्यांकडून शेतक-यांची पिळवणूक आणि फसवणूक केली जात आहे. अशा विक्रेत्यांवर सरकारने तात्काळ कठोर करावाई करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List