एका गुणी नटीचं असं होणं हे दुर्दैवच..; रंजनाबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?
अभिनेते अशोक सराफ आणि रंजना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. ‘सुशीला’ या चित्रपटामुळे रंजना स्टार बनल्या होत्या. एकमेकांसोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केल्याने दोघांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला होता. एखाद्या सीनमध्ये अशोक सराफ काय करणार हे रंजना यांना आधीच कळायचं आणि रंजना काय करणार हे अशोक यांना लगेच समजायचं. त्यामुळे ऑनस्क्रीन दोघांच्या प्रतिक्रियाही फटकन् यायच्या आणि दोघांचे एकत्र सीन छान वठायचे. ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचूप गुपचूप’ या चित्रपटांमधील दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. परंतु 1984 मध्ये रंजना यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्या त्यांच्या पायावर उठून उभ्या राहू शकल्या नव्हत्या. ‘मी बहुरूपी’ या आत्मचरित्रात अशोक सराफ यांनी रंजना यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.
“अभिनेत्री म्हणून रंजना खूप हुशार होती. विलक्षण निरीक्षणशक्ती आणि नवीन काही शिकल्यानंतर ते आत्मसात करायची वृत्ती तिच्याकडे होती. माझी फॅन तर ती आधीपासूनच होती. मराठी चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत मेहनती अभिनेत्रींमध्ये मी रंजनाचं नाव घेईन”, असं त्यांनी म्हटलंय.
1981 मध्ये ‘गोंधळात गोंधळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अशोक सराफ-रंजना ही जोडी हिट झाली. त्याआधीही दोघांनी एकत्र काम केलं होतं, परंतु ते चित्रपट तितके गाजले नव्हते. गोंधळात गोंधळ या चित्रपटानंतर दोघांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. परंतु अपघातानंतर रंजना यांची कारकीर्द खंडित झाली होती. एका गुणी नटीचं असं होणं हे दुर्दैवच म्हणायला हवं, अशा शब्दांत अशोक सराफ यांनी आत्मचरित्रात भावना व्यक्त केल्या.
‘दैवत’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचाही किस्सा अशोक सराफ यांनी या आत्मचरित्रात सांगितला आहे. नाशिकमधल्या एका हॉस्पिटमध्ये दोघं शूटिंग करत होते. हा सीन सुरू झाला आणि थोड्या वेळाने हॉस्पिटल बाहेरून गलका ऐकू यायला लागला. आरडाओरड सुरू झाली होती. लोक रंजना आणि अशोक सराफ यांच्या नावां बेंबीच्या देठापासून हाका मारत होते. त्यावेळी दोघंही लोकप्रिय कलाकार होते. त्यामुळे दोघांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती.
‘ए अशोक, बाहेर ये..’, ‘अशोक आणि रंजना बाहेर पडा..’, असे आवाज यायला लागले. काही वेळानं खिडक्यांवर दगड येऊन आदळले. सेटवरील सर्वजण जागच्या जागी स्तब्ध झाले होते. शेवटी दिग्दर्शकांनी अशोक सराफ आणि रंजना यांना बाहेर आणलं. लोकांनी त्यांना पाहिलं आणि मग तो जमाव शांत झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List