पहलगाम हल्ल्याच्या बदल्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग; पंतप्रधानांनी वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांची घेतली भेट
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला हिंदुस्थान कसा बदला घेणार याकडे जगाचं लक्षं लागलं आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त आहे. ही बैठक अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ चालली. पंतप्रधानांनी याआधी एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही बैठक झाली. 26 निष्पापांची पहलगाममध्ये हत्या करण्यात आल्यानंतर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या पाकिस्तानविरुद्ध कशी कारवाई करावी याबद्दल विचारणा होत असताना पंतप्रधानांनी आतापर्यंत लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांची भेट घेतली आहे.
जम्मू आणि कश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी 26 जणांची निर्घृण हत्या करून बारा दिवस उलटले आहेत. या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आणि कट रचणाऱ्यांना अशी शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मागणी होत आहे.
हिंदुस्थानने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक पावले उचलली आहेत, ज्यामध्ये सिंधू जल करार आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित करण्याचा निर्णय समाविष्ट आहे. नवी दिल्लीने इस्लामाबादला कडक संदेश पाठवल्याने हिंदुस्तानातील पाकिस्तानी मिशनमधील राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. पाकिस्तानने असे म्हटले आहे की पाण्याचा प्रवाह रोखण्याचे कोणतेही पाऊल युद्ध मानले जाईल आणि नियंत्रण रेषेचे उल्लंघन करणाऱ्या सिमला करारासह सर्व द्विपक्षीय करार निलंबित करण्याची धमकी दिली आहे.
गेल्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उच्च मंत्री आणि सुरक्षा आस्थापनेतील अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. हिंदुस्थानच्या पुढील कारवाई बाबातचे संकेत देत, संरक्षण मंत्री सिंग यांनी काल राष्ट्राला आश्वासन दिले की ‘तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच होईल’.
‘एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थानची भौतिक सुरक्षा नेहमीच आपल्या शूर सैनिकांनी केली आहे… संरक्षण मंत्री म्हणून, देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी माझ्या सैनिकांसोबत काम करणे ही माझी जबाबदारी आहे आणि आपल्या देशाला धमकी देणाऱ्यांना योग्य उत्तर देणे हे माझे कर्तव्य आहे’, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List