‘PAK आर्मीने आमच्या देशाला उद्ध्वस्त केलं’; अदनान सामीसमोर पाकिस्तानी मुलांनी बोलून दाखवली खदखद
“सर तुम्ही योग्य वेळी पाकिस्तान सोडलात, आम्हालाही आमचं नागरिकत्व बदलायचं आहे”, असं काही पाकिस्तानी मुलांनी सांगितल्याचा खुलासा प्रसिद्ध गायक अदनान सामीने केला. याविषयीची पोस्ट त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिली आहे. आम्ही पाकिस्तानी सैन्याचा द्वेष करतो, कारण सैन्याने देशाला उद्ध्वस्त केलंय, असंही तरुणांनी म्हटल्याचं अदनान सामीने नमूद केलंय. अदनानकडे आधी पाकिस्तानचं नागरिकत्व होतं. काही वर्षांपूर्वी तो भारतात आला आणि त्याने इथलं नागरिकत्व मिळवलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अदनान सामीने केलेलं हे ट्विट विशेष चर्चेत आलं आहे.
अदनान सामीचं ट्विट-
‘अझरबैजानच्या बाकूमधील सुंदर रस्त्यावर चालताना काही पाकिस्तानी मुलांशी भेट झाली. ते म्हणाले, सर, तुम्ही खूप नशीबवान आहात. आम्हालाही आमचं नागरिकत्व बदलायचं आहे. आम्ही आमच्या सैन्याचा द्वेष करतो, त्यांनी आमच्या देशाला उद्ध्वस्त केलंय. त्यावर मी त्यांना प्रतिक्रिया दिली की, मला हे खूप आधीच समजलं होतं’ असं अदनाने लिहिलं आहे.
Met some very sweet Pakistani boys while walking on the beautiful streets of Baku, Azerbaijan…
They said “Sir, You are very lucky.. You left Pakistan in good time.. We also want to change our citizenship…WE HATE OUR ARMY…They have destroyed our country!!”
I replied “ I knew…— Adnan Sami (@AdnanSamiLive) May 4, 2025
अदनानचा जन्म लंडनमध्ये झाला असून त्याचे वडील पाकिस्तानी आणि आई भारतीय आहे. 2001 पासून तो भारतात राहू लागला असून डिसेंबर 2015 मध्ये त्याला भारताचं नागरिकत्व मिळालं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हा पाकिस्तानचे माजी माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी अदनान सामीचा उल्लेख करत त्याच्या राष्ट्रीयत्वावरून सवाल उपस्थित केला होता. फवाद यांच्या या पोस्टवर अदनानने सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘या अडाणी मूर्ख व्यक्तीला कोण सांगणार?’ असं ट्विट त्याने केलं होतं.
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यावेळी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले असून 20 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा अदनान सामीनेही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List