चंद्रपुरात विजेच्या धक्क्याने सायकल स्वाराचा मृत्यू; वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाने बळी गेल्याचा आरोप
चंद्रपुरात आकाशवाणीपासून जगन्नाथ बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताचे नाव प्रभाकर गणपत क्षीरसागर असून ते दाताळा येथील रहिवासी आहे. चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून 11 केव्ही विजेची तार जाते. रविवारी संध्याकाळी आलेल्या पाऊसमुळे ही तार तुटून रस्त्यावर पडली. काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही किंवा पडलेली तार सुद्धा उचलली नाही.
यादरम्यान याच रस्त्याने जात असताना क्षीरसागर यांच्या सायकलच्या चाकात विजेची तार अडकल्याने ते पडले आणि त्यांचा तारेला स्पर्श झाला. 11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दाताळा व जगन्नाथ नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला.
वीज वितरण कंपनीला ऑनलाईन तक्रार करूनही एक ते दीड तासापर्यंत 11 केव्हीची तुटून वर्दुळीच्या रस्त्यावर पडलेली विजेची तार उचलण्यास व वीज पुरवठा बंद करण्यास विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी अक्षम्य विलंब केला. वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे एका निष्पाप नागरिकाच्या नाहक बळी गेला. कमावता व्यक्ती गेल्याने क्षीरसागर कुटुंब उघड्यावर पडले. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List