तापमान वाढताच महाराष्ट्र तहानला! राज्यात पाणी टंचाईच्या झळा, टँकरच्या फेऱ्या वाढल्या, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भीषण
एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या झळांसोबतच राज्यातील अनेक धरणं, तलावातील जलसाठा कमी झाला आहे. नदी-नाले तर कधीच कोरडेठाक झाले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तर राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर हंडे मोर्चे निघत आहे. उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज स्थानिक स्वराज्य संस्थांनी न केल्याने नागरिकांचा असंतोष दिसून येत आहे.
अमरावती विभागात भीषण पाणी टंचाई
अमरावती आणि बडनेराचा शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेरपिंगळाई जवळ 1500 मिमी व्यासाची पाईपलाईन लीक झाल्याने आता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावतीसह बडनेरा शहरात जलसंकट उभे ठाकले आहे. 24 तारखेला नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
टँकरच्या फेऱ्या वाढल्या
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील सात गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील 776 गावांसाठीच्या तातडीच्या उपायोजना 50% वरच असल्याने पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहेत. मागील तीन दिवसांपासून अमरावतीच्या तापमानात वाढ झाल्याने पाणी टंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आदिवासी पाड्यावर मोठी कसरत
चिखलदरा तालुक्यातील कोहना गावातील नागरिकांचे पाणी भरण्यासाठी दिवसातले सहा तास जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या “मोथा” गावात यंदाही भीषण पाणीटंचाई आहे. गावातील तलाव पूर्ण कोरडा पडल्याने गावाशेजारील विहिरीहून महिलांना पाणी आणावे लागत आहे. टँकरद्वारे विहीरीत पाणी सोडले जाते आणि मग ते पाणी महिला भरतात. मोथा गावातील महिलांचा अर्धा दिवस पाणी भरण्यातच जात असल्याचा समोर आले आहे. दुसरीकडे मेळघाटातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. तर तलाव कोरडेठाक पडले आहेत. आदिवासींवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
पाच जिल्ह्यातील प्रकल्पांच्या घशाला कोरड
वाढत्या तापमानाचा पश्चिम विदर्भातील जलसाठ्यांना मोठा फटका बसला आहे. जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. पाच जिल्ह्यातील अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. एकूण 289 प्रकल्पात या भागात आहेत. या पाचही जिल्ह्यातील जलसाठा 35.51 टक्क्यांवर आला आहे.
1) अमरावती जिल्हा- 56 प्रकल्प,46.29 टक्के जल साठा, 28 प्रकल्प कोरडे, टँकर पाणी पुरवठा संख्या 12
2) यवतमाळ जिल्हा –74 प्रकल्प, 32.97, टँकर संख्या 6
3) अकोला जिल्हा –30 प्रकल्प, 31.50
4) वाशिम जिल्हा –78 प्रकल्प,25.17
5) बुलढाणा जिल्हा –51 प्रकल्प,27.7,टँकर पाणी पुरवठा संख्या 31
चंद्रपूरात भीषण पाणी टंचाई
चंद्रपूर शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मनपा दररोज विविध वार्डांमध्ये 180 टँकर फेऱ्या करत आहेत. अमृत योजनेचे कामकाज संथगतीने असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई भासत आहे. अपुरे पाणी मिळत असल्याने नागरिक हतबल झाले आहेत.
जालना जिल्ह्यात पाणी टंचाई
जालना जिल्ह्यातील ६४ प्रकल्पापैकी 3 प्रकल्प पूर्णता कोरडे ठाक पडले असून 24 प्रकल्पांमध्ये केवळ मृत साठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा अधिकच वाढत चालल्याने पाण्याचा बाष्पीभवन होत आहे. परिणामी झपाट्याने पाणी पातळी खाली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. ग्रामीण भागात विहिरी कुपनलिका यांनी सुद्धा तळ गाठल्यामुळे नागरिकाना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दरम्यान पुढील एक ते दीड महिन्यात अजून पाणीटंचाई वाढण्याची शक्यता असल्याने टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
यवतमाळकरांना पाणी टंचाईचे चटके
यवतमाळ जिल्ह्यात 79 हजार नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बसत आहे. प्रशासनाकडून 57 विहरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील 330 गावात पाणीटंचाईचा फटका बसला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 3 कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
धुळेकरांना सध्या दिलासा
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडर गाव तलावामध्ये 90 टक्के जलसाठा शिल्लक आहे. डेडरगाव तलाव हा 150 दशलक्ष घनमीटर क्षमतेचा असून याद्वारे मोहाडी अवधान मिल परिसर या भागामध्ये पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलाव डेडरगाव तलाव आणि हरणमाळ तलावात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असला तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन प्रशासनाने केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List