आशा सेविकांना दोन महिने पगाराची कवडीही नाही; सरकारचे सपशेल दुर्लक्ष, गणेशोत्सव, दसरापाठोपाठ दिवाळीही अंधारात

आशा सेविकांना दोन महिने पगाराची कवडीही नाही; सरकारचे सपशेल दुर्लक्ष, गणेशोत्सव, दसरापाठोपाठ दिवाळीही अंधारात

रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सुमारे दीड हजार आशा सेविकांची दिवाळी यंदा अंधारात जाणार आहे. या आशा सेविकांना गेल्या दोन महिन्यांपासून शासनाने मानधन दिले नाही. त्यामुळे त्यांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासह दसरा सण साजरा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता दिवाळीचा सण चार दिवसांवर आला असतानाही त्यांचे मानधन काढण्याच्या कोणत्याही हाल चाली शासकीय पातळीवर सुरू नाहीत. लागोपाठ दोन महिने मानधन न मिळाल्यामुळे या आशा सेविकांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजारांहून अधिक आशा सेविका आहेत. आशा सेविकांच्या मदतीने शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवल्या जातात. आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात देणे, माता-बालमृत्यूचे प्रमाण टाळणे, बालक व मातेचे आरोग्य राखण्याबरोबरच जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, बालकांसह मातांचे लसीकरण करणे आदी कामेही आशा सेविकांना करावी लागतात. गावातील प्रसूत महिलेला दवाखान्यात नेण्यापासून त्यांचे आरोग्य राखण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारीही आशा सेविकांवर असते. कृष्ठरोग व इतर साथीच्या आजारांवर उपाय करण्यासाठी अंमल बजावणी करणे, जनजागृती करणे, आयुष्मान कार्ड काढण्यासाठी गावागावात प्रचार व प्रसार करण्याचे कामही आशा सेविका करीत असतात. राज्य शासनासह केंद्र शासनाच्या योजनांची कामे आशा सेविकांमार्फत केली जात आहेत. कामाचा इतका ताण असतानाही त्यांचे मानधन वेळेवर काढले जात नाही. गेल्या दोन महिन्यांपासून मानधन न काढल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे.

रिचार्ज भत्ताही मिळत नाही

शासनाच्या सर्व योजनांची कामे आशा सेविकांमार्फत केली जात आहेत, परंतु त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही. ऑनलाइन कामे आशा सेविकांकडून करून घेतली जात असली तरी त्यांना लागणारी यंत्रणा, पुरेसा रिचार्ज भत्ता दिला जात नाही. आशा सेविकांना फक्त राबवून घेतले जात आहे. शासनाकडून वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आशा सेविकांची नेहमीच पिळकवणूक

आशा सेविकांच्या मदतीने शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते. तळागाळापर्यंत योजना पोहोचवून सर्वसामान्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम करतात. मात्र त्यांची प्रत्येक वेळी पिळवणूक केली जाते. ही फार मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया आशा सेविका प्रांजली कदम यांनी दिली आहे.

… तर तीव्र आंदोलन छेडणार

मानधन देण्यासाठी शासनाची भूमिका उदासीन दिसत आहे. जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना शासनाने दिवाळीपूर्वी मानधन द्यावे. चार दिवसांत जर मानधन मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.

मागण्यांची दखल घेतली जात नाही

मागण्यांसाठी अनेक वेळा शासन दरबारी निवेदन दिले आहे. वरिष्ठ पातळीवर चचदिखील केली आहे, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. दर महिन्याला वेळेवर मानधन मिळावे यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली आहे. मात्र मानधन कधीच वेळेवर मिळत नाही, अशी खंत आशा सेविका वैशाली म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;