पहलगामवरून संसदेत गदारोळ, विरोधकांच्या आक्रमणापुढे सरकार नमले… ‘सिंदूर’वर चर्चा होणार
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज पहलगाम दहशतवादी हल्ला व ऑपरेशन ‘सिंदूर’वरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या आक्रमणापुढे नमते घेत सरकारने चर्चेची तयारी दर्शवली. त्यानुसार, या विषयावर पुढील आठवडय़ात लोकसभेत 16 तास आणि राज्यसभेत 9 तास चर्चा होणार आहे, मात्र ही चर्चा आतापासूनच सुरू करावी व चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर द्यावे, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.
पहलगामचा दहशतवादी हल्ला व त्यानंतर हिंदुस्थानने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी अनेक कारणांमुळे संशय निर्माण झाला आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात नेमकी चूक कोणाची होती?
ऑपरेशन सिंदूरमध्ये देशाचे किती नुकसान झाले? किती लढाऊ विमाने पडली आणि हे ऑपरेशन अचानक का थांबवले गेले? डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठी दबाव आणला होता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देशाला हवी आहेत. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीने याआधीच केली होती, मात्र सरकारने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता इंडिया आघाडीने सरकारला खिंडीत गाठले आहे.
पहिल्याच दिवशी ‘इंडिया’चा आवाज
संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘इंडिया आघाडी’चा आवाज घुमला. लोकसभेत सुरुवातीला अहमदाबाद दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाची घोषणा केली. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले व ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेची मागणी केली. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम व ‘सिंदूर’वर चर्चेची मागणी केली. त्यांनी ही मागणी करताच इंडिया आघाडीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गदारोळ झाला व दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
राहुल गांधींना बोलू दिले नाही
‘संसदेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांना बोलण्याची मोकळीक दिली जाते. संरक्षणमंत्र्यांना बोलू दिले जाते, सरकारचे इतर लोक बोलतात, पण विरोधी पक्षाला बोलण्याची परवानगी नाकारली जाते. मी विरोधी पक्षाचा नेता आहे. सभागृहात मत मांडण्याचा माझा अधिकार आहे, पण मला बोलूच दिले जात नाही, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.
दहशतवादी ना पकडले ना मारले
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज चर्चेची मागणी केली. पहलगाम हल्ला 22 एप्रिलला झाला. मात्र हा हल्ला करणारे दहशवादी अद्याप ना पकडले गेले, ना मारले गेले. त्यांचे काय झाले, याचे उत्तर मिळायला हवे, असे खरगे म्हणाले. हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे, असे नायब राज्यपालांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी 24 वेळा दावा केला की मीच हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं. या साऱ्यावर खुलासा करा, असे खरगे यांनी ठणकावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List