Maharashtra Monsoon Session 2025 – सर्वाधिक पोलीस मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने, पोलिसांच्या प्रश्नांवर अंबादास दानवे यांनी सभागृहात उठवला आवाज
समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न तसेच त्यांच्या आरोग्याविषयावरील प्रश्न आणि डिजीटल लोन, अशा प्रश्नांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात वाचा फोडली.
पोलिसांच्या ड्युटीचा कालावधी हा 8 तासांचा असला तरी, किमान 12 तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलीस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान 16 ते 18 तास त्यांचे ड्युटी व प्रवासात जातात. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे, हाती आलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पोलीस मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली.
पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. पोलिसांच्या शासकीय घरांची दूरवस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून त्यांना डिजीटल लोन मिळत नाही. आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहे का? असा प्रश्न यावेळी दानवे यांनी सरकारला विचारत पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
मुंबईत पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे नूतनीकरण होणार आहे. तसेच डिजी लोनचे प्रलंबित अर्ज निकाले काढू, असे आश्वासन यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List