अनुराग कश्यपला ‘छावा’चे दिग्दर्शक स्पष्टच म्हणाले ‘निघून जा..’; नेमकं काय घडलं?
बॉलिवूड इंडस्ट्री सोडून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जाण्याबाबतच्या दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यावर ‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग कश्यप हे प्रेक्षकांना समजू शकत नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. लक्ष्मण उतेकर यांच्या मते, बॉलिवूड चित्रपट अजूनही कोट्यवधींची कमाई करत आहेत आणि जर त्यांना जायचं असेल तर ते खुशाल जाऊ शकतात, त्यांना कोणीही रोखत नाही.
‘ममाज काऊच’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग यांच्याबद्दल बोलताना उतेकर म्हणाले, “तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकता, अर्थातच तुम्ही जाऊ शकता. कोणीही तुम्हाला बळजबरी करत नाही. हे पहा, ही इंडस्ट्री अशी आहे की तुम्हाला मानसिक आणि सर्जनशीलदृष्ट्या आनंदी राहावं लागतं. तरंच आपण उत्तम चित्रपट बनवू शकतो. जर तुम्हाला इथं राहायचं नसेल तर तुम्ही उत्तम चित्रपट कसा बनवू शकता? त्यापेक्षा तुम्ही निघून जा.”
लक्ष्मण उतेकर यांनी यावेळी अनुराग कश्यप यांच्या मतांबद्दल रोखठोक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “त्यांच्या चित्रपटांचा स्वीकार करण्याची समज प्रेक्षकांमध्ये नाही असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचे आहेत. उलट प्रेक्षकांच्या दृष्टीकोनाला स्वीकारण्याची समज त्यांना नाही. आज चित्रपट 700 ते 800 कोटी रुपयांचा बिझनेस करत आहेत. मग तुम्ही कसं म्हणू शकता की चित्रपट मरतायत? तुम्ही बाहुबली, आरआरआर, पुष्पा यांची कमाई पहा. या चित्रपटांनी 1200 कोटी रुपयांपर्यंतची कमाई केली आहे. तुम्ही ‘छावा’च्याही कमाईचा आकडा पहा. तुमची समजूत बदलली पाहिजे कारण तुम्ही तिथेच अडकले आहात”, अशा शब्दांत त्यांनी कश्यप यांना सुनावलं आहे.
काळानुसार प्रेक्षकांची आवड-निवड बदलत असल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला. ते पुढे म्हणाले, “आज प्रेक्षकांच्या फोनमध्ये जगभरातील चित्रपट आहेत. ते तुमच्यापेक्षा जास्त अपडेटेड आहेत. त्यांना काय पहायचं आणि काय पाहू नये हे माहीत आहे. दर तीन वर्षांनी सिनेमा बदलत असतो. छायांकन बदलत आहे, एडिटिंग बदलत आहे, कथा, पोशाख सर्वकाही बदलतंय. एक दिग्दर्शक म्हणून तुम्हालाही बदलावं लागेल. तुम्ही भूतकाळात अडकून असं म्हणू शकत नाही की प्रेक्षकांना समजत नाही. तुम्हाला बदलण्याची गरज आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List