पंजाबमध्ये पुराचे थैमान; 23 जिल्हे पाण्याखाली, लुधियाना ते नूरवालापर्यंत पूरपरिस्थिती
उत्तर हिंदुस्थानात ढगफुटी, अतिवृष्टीने मोठा प्रकोप घडवला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीरप्रमाणेच या अतिवृष्टीचा पंजाबलाही मोठा फटका बसला आहे. पंजाबमध्ये सतलज नदीची पाणीपातळी वाढल्याने पुराचा धोकाही वाढला आहे. लुधियानामध्ये धरण फुटल्याने 15 गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३.८४ लाख लोक बाधित झाले आहेत. २१,९२९ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे आणि १९६ जण मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. प्रशासनाने धरणाची धूप थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. अधिकाऱ्यांच्या मते, जर येथून पाणी पुढे सरकले तर लुधियानातील १४ गावे पूरग्रस्त होऊ शकतात. तसेच राहोन रोड, टिब्बा रोड, ताजपूर रोड, नूरवाला रोड आणि समरला चौक यासारख्या शहरी भागात पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. साहनेवालमधील धनांसू भागातही पाणी साचू शकते, ज्यामुळे सुमारे ५० हजार लोक प्रभावित होतील.
महसूल, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री हरदीप सिंग मुंडियन यांनी शुक्रवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तथापि, ४ सप्टेंबरपर्यंत राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २१,९२९ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे आणि १९६ मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, ज्यामध्ये ७,१०८ लोकांनी आश्रय घेतला आहे. फाजिल्का येथील मदत छावण्यांमध्ये सर्वाधिक २,५४८ लोकांना पाठवण्यात आले, तर होशियारपूर (१,०४१), फिरोजपूर (७७६) आणि पठाणकोट (६९३) येथील छावण्यांमध्येही बाधित लोकांना ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १.७२ लाख हेक्टर शेती जमिनीचे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत राज्यातील २३ जिल्हे आणि १,९४८ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. सुमारे ३.८४ लाख लोकसंख्येला त्याचा थेट फटका बसत आहे. केंद्रीय पथके देखील बाधित भागांना भेट देऊन अहवाल तयार करत आहेत. यामध्ये कृषी, ग्रामीण विकास, ऊर्जा, वित्त, रस्ते आणि जलशक्ती विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List