रस्त्यावर कोणी बहिणीची टिंगल केली की..; नाना पाटेकरांचा सर्व पुरुषांना कडक सल्ला
“सामाजिक पद्धतीने काम केल्यानंतर मी केवळ मी राहत नाही. सर्व जातीधर्माची लोकं एकत्र येतात. सगळ्याच गोष्टी या केवळ आर्थिक नसतात. आता जी तेढ आहे.. तुझी जात कुठली, माझी जात कुठली, तुझा धर्म कुठला.. यात प्रत्येकजण.. काही राजकारणी असतील, आपला स्वार्थ साधण्यासाठी करत असतील. पण मला असं वाटतं की आम्ही एकच आहोत ही धारणा महत्त्वाची आहे,” असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केलंय. माजी आयएएस अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली ‘दुष्काळी, अविकसित निढळ’ ते ‘स्मार्ट व्हिलेज निढळ’ असा ४१ वर्षांचा प्रवास ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाच्या रुपाने उलगडला आहे. याच पुस्तक प्रकाश सोहळ्यात नाना बोलत होते.
“इतका साधा का राहतो?”
या कार्यक्रमात नाना पुढे म्हणाले, “मी सामान्य आहे यात खूप मोठी ताकद आहे. मी सामान्य आहे याचा मला अतिशय आनंद आहे, अभिमान आहे. मला कोणीही बॉडीगार्ड लागत नाही. तुम्ही सगळे माझे बॉडीगार्ड.. मला कोण त्रास देणार आहे? माझ्या मागेपुढे कोणी असायची गरज नाही. मी आता एका नटासोबत काम करत होतो, त्याने विचारलं, तुम्ही इतके साधे कसे असता? मी म्हटलं साधे कसलं? देवाने इतकं काहीतरी दिलेलं आहे. तो म्हणाला, तुमचे कपडे इतके साधे.. मी म्हटलं, हे सर्वांत महाग कपडे आहेत, खादी आहे. याच्यापेक्षा महाग कपडे नाहीत. हे रोज धुवावे लागतात. तुझ्या जीन्ससारखे नाही, महिनाभरानं धुवावं लागणारे. इतकं मला भरभरून दिलंय, त्यातलं सगळं माझंच नाहीये. एक दाणा पेरल्यानंतर हजार दाणे कणसाला येतात. आपण त्यातले दहा घेऊ, शंभर घेऊ.. बाकीचे देऊन टाकुया ना. एवढे लागत नाहीत.”
“आमच्या कुठल्यातरी बेसावध क्षणी नाम फाऊंडेशनची स्थापना झाली. तो क्षण बेसावधच होता. आम्ही सगळ्या गोष्टी करतो. आम्हालाही व्यसनं आहेत. पण त्यातून एखाद्या क्षणी तुम्हाला ती गोष्ट दिसत असेल, समाजातील विसंगती मला दूर करता येईल का, असा विचार येणंसुद्धा खूप आहे. तो विचार अनवधानानं आला आणि नाम फाऊंडेशनची स्थापना झाली,” असं म्हणत त्यांनी ‘नाम फाऊंडेशन’ची गोष्ट सांगितली.
नितीन गडकरींचा कोट
या कार्यक्रमात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचादेखील एक किस्सा सांगितला. “काश्मीरला गेल्यानंतर मला हुडहुडी भरली होती. नंतर तिथे कपडे विकत घेतले. नागपूरला किंवा दिल्लीला गेल्यावरही गडकरीजींनी त्यांचा कोट मला दिला होता. तो काय त्यांना मी परत दिला नाही, माझ्याकडेच ठेवलाय. परदेशी गेल्यावर पण मला यातच कम्फर्टेबल वाटतं.”
“माझे वडीलसुद्धा असेच होते. त्यामुळे मला त्यांच्यासोबतच चालत असल्यासारखं वाटतं. सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझ्या आईवडिलांना पाहत असतो. कोणी वयोवृद्ध दिसले की मी पटकन वाकतो. हे आपल्या गावातले संस्कार आहेत. शहरामध्ये तुम्ही खरंच राहू नका. शहरामध्ये श्वास घेता येत नाही. सगळं सोडून मी आता गावात गेलोय कुठेतरी. शहरामध्ये जिथे तुम्ही दहा श्वास घेतला, तिथे एक घेतलेला पुरतो. इतकं प्रदुषण आहे, नको वाटतं. सरतेशेवटी स्क्वेअर फूटमध्ये राहतो आपण. मी म्हणतो, आमच्याकडे भिंती नाहीत, आमच्याकडे डोंगर आहेत. कसा आनंद नाही मिळणार”, असा सवाल करत त्यांनी ग्रामीण जीवनाचं महत्त्व अधोरेखित केलं.
“बहिणीची कोणी टिंगल केली तर..”
“रस्त्यावरून चालत असताना माझ्या बहिणीची कोणी टिंगल केली तर मी कसा शांत बसू? कोणाचीही बहीण असेल तरी तसे चिडून तुम्ही अंगावर जा. एकच फटका मारा आणि आडवा करा त्याला. त्यादिवशी तुम्हाला आपण खरे पुरुष काय आहोत, याच साक्षात्कार होतो. समोर ज्याच्या हातात शस्त्र असतं, तो सर्वांत नेभळट आणि शंढ असतो, हे लक्षात ठेवा. त्याला भिडायची ताकद ठेवा. आपल्यात ही सगळी ऊर्जा, ताकद आहे,” असं ते पुढे म्हणाले.
यावेळी नानांनी आताच्या पिढीच्या कलेक्टर्सचं कौतुक केलं. “आता जे सगळे कलेक्टर्स आहेत, जी शासकीय क्षेत्रातील मुलं आहेत, ते इतकं भन्नाट काम करत आहेत. कुठेही एक पैशाचा अपहार नाही, भ्रष्टाचार नाही. जुना सगळा पॅटर्न गेला, हे नवीन पॅटर्न आहे. त्यामुळे सगळं निराशाजनक नाही,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List