पार्वती पतये हर हर महादेव..; भारताच्या एअर-स्ट्राइकनंतर रवीना टंडनची प्रतिक्रिया चर्चेत
पहलगाम हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. मध्यरात्री 1.05 ते 1.30 वाजताच्या दरम्यान झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. या ऑपरेशनवर देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. अभिनेत्री रवीना टंडननेही यावर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाली रवीना?
‘भारत नेहमीच शांतता आणि नीतिमत्तेसाठी उभा राहिला आहे. तरीही अनेक दशकांपासून आपल्याला शत्रूंकडून झालेल्या छुप्या युद्धाचा सामना करावा लागतोय. अनेक चर्चांद्वारे, पुढाकारांद्वारे शांतता प्रदान करूनही दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपण असंख्य निष्पाप जीव गमावले आहेत. जगाने आता दहशतवादाच्या कारखान्यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे. भारताने अत्यंत विचारपूर्वक कृती केली आहे. नागरिकांवर नाही तर केवळ दहशतवादी तळांना नष्ट करण्यावर भारताने लक्ष केंद्रीत केलंय. आपल्या सैन्याने आणि लोकांनी प्रचंड संयम आणि धैर्य दाखवलं आहे’, असं तिने म्हटलंय.
‘मी माझ्या राष्ट्राच्या, आपल्या सशस्त्र दलांच्या, आपल्या नेतृत्वाच्या आणि आपल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. श्रीराम आपल्याला वाईटाचा सर्वनाश करण्यासाठी मार्गदर्शन करो, कधीही निष्पाप लोकांचा नाही. जय भवानी, पार्वती पतये हर हर महादेव! जय हिंद.. भारत प्रथम’, असा जयघोष तिने केला.
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवरील स्ट्राइक आणि नकाशे यांचं फुटेज दाखवलं. यात कोणत्याही नागरिकाच्या मृत्यूचा रिपोर्ट नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान भारताने केलेल्या या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती आहे. मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जण या हवाई हल्ल्यात मारले गेले आहेत. यामध्ये त्याची पत्नी, मुलगी आणि भाऊ-बहिणींचाही समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List