भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक; हानिया आमिर, माहिरा खान यांचे अकाऊंट्स बंद
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट्स बुधवारी संध्याकाळी भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. हानिया आमिर, माहिरा खान, अली जफर यांसह इतरही काही पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट्स आता भारतात युजर्सना दिसणार नाहीत. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांनी आपले प्राण गमावले होते. पाकिस्तानातून सुरू असलेल्या सीमापार दहशतवादामुळे हा हल्ला झाल्याचं भारत सरकारने म्हटलंय. त्यानंतर भारताने चिथावणीखोर आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट पसरवल्याच्या आरोपाखाली 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली होती. आता पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही निर्बंध लागू झाले आहेत.
इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लॉक केलेल्या पाकिस्तानी कलाकारांपैकी हानिया आमिरचा भारतात खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘मेरे हमसफर’, ‘कभी मैं कभी तुम’ यांसारख्या मालिकांमधून तिला लोकप्रिया मिळाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हानियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित निषेध व्यक्त केला होता. ‘कुठेही घडणारी दुर्घटना ही सर्वांसाठी एक दुर्दैवी घटना असते. अलिकडेच घडलेल्या घटनांमध्ये ज्या निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्यासाठी माझ्या मनात संवेदना आहेत. दु:खाची भाषा एकच असते. आपण नेहमीच माणुसकीची निवड करुया’, असं तिने लिहिलं होतं.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने 2017 मध्ये अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गायक आणि अभिनेता अली जफरलाही निर्बंधांचा मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे फवाद खान आणि आतिफ अस्लम यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट अजूनही भारतात सुरू आहेत. फवाद त्याच्या आगामी ‘अबीर गुलाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होता. परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. 2016 च्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. अनेक युट्यूबर्सचे चॅनल्सही भारतात बंद करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली. त्याचसोबत अटारी-वाघा बॉर्डर बंद केली, पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी केले. याविरोधात इस्लामाबादने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करून आणि तिसऱ्या देशांद्वारे होणाऱ्या अप्रत्यक्ष व्यापारासह सर्व व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भारताच्या पाणीवाटप कराराच्या स्थगितीलाही नकार दिला आहे. पाण्याच्या प्रवाहात कोणताही अडथळा आणणं हे युद्धाचं कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List