जो उपाय तुम्ही 2018 साली विधानसभेत सांगितला होता त्याची अंमलबजावणी करा; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काही काळ चर्चा देखील झाली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी भाजपवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सलग अकरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. 2018 साली देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरक्षणाची सविस्तर मागणी केली होती आणि आरक्षण कसे देता येईल? याबाबतही आपल्या भाषणात सांगितले होते. आज ते सत्तेत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जो उपाय तुम्ही 2018 साली विधानसभेत सांगितला होता त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
माझी नैतिक जबाबदारी आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सर्वांच्या भावनांचा आदर मी केलाच पाहिजे. एखाद्याच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे, समजून घेणे आणि नुसते समजून घेणे नाही तर त्यातून मार्ग काढणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. इतके मोठे आंदोलन सुरू आहे, एखादी अशी गोष्ट घडणे आपण समजू शकतो. तरूण मुले आहेत, त्यांच्या काही भावना असतात. जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्याने त्यांची भेट घेण्यासाठी आपण गेलो होतो. राज्य सरकारला आणि मुंबई महापालिकेला विनंती आहे की, आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छेतेकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांच्याबाबत सरकारकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मलाही गंमत वाटते की, एकीकडे आम्हाला संपवलं, संपलं असे म्हणतात. छोटा पक्ष म्हणतात आणि इतकं मोठं आंदोलन उभे राहते तेव्हा त्याचा केंद्रबिंदू शरद पवारच आहेत, असे म्हणातात. त्यांचे 250 आमदार आहेत. तीनशे खासदार आहेत असा पक्ष शरद पवारांकडे वळतो ही कमालच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
आंदोलनाला जबाबदार सरकार आहे, आंदोलन हाताच्या बाहेर नाही, सरकारला विनम्र विनंती करते की सर्वपक्षीय बैठक बोलवा सगळ्यांशी चर्चा करा जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट बोलवा. अधिवेशन बोलावा, 24 तासात हे सगळं मान्य करून टाका मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा. गृहखात्याला माहिती आहे तर आम्हाला पण कळू द्या. गृहखाते नाही तर सरकार फेल ठरले आहे, जबाबदारी सगळी घ्यायची असते. कायदा सुव्यवस्था सरकार करत आहे का आणि काल जरांगे पाटील यांनी याबाबत आंदोलकांना सांगितले आहे. सरकारकडून अजून कोणीही गेले नाही ,पोलिस कोणी गेले नाही, अतिशय अस्वच्छता आहे, सरकार ऐकत नसेल पण काही अधिकारी काम करत आहेत.मुंबईकरांना वेठीस धरले जाते तर चर्चेला बसा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List