शक्तीपीठ महामार्गास संमती दिल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा कांगावा, एक टक्काही शेतकऱ्यांचे समर्थन नाही!
कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास संमती दिली असल्याचा कांगावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामध्ये त्यांचा ढोंगीपणा समोर आल्याचा खळबळजनक आरोप शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती तसेच स्वा.शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मुंबईत दोन दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील केवळ 35 शेतकऱ्यांनीच सात बारा दिले असल्याने, एक टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.
दोन दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठकीत घेतली. या बैठकीत 35 लोकांनी सात बारा शासनाकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3 हजार 822 गटधारकांची जवळपास 5 हजार 300 एकर जमीन संपादित केली जाणार असून, या गटामध्ये 10 हजारहून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत. यामुळे गटधारकांच्या एक टक्काही लोकांचे या महामार्गास संमती नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग समर्थनासाठी जो खटाटोप करत आहे, त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले आहेत. ज्यापद्धतीने कोल्हापूरची करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीने कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला, आता कोल्हापुर शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रूपी राक्षसापासून कोल्हापूरच्या जनतेचे रक्षण आई अंबाबाईच करेल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गेल्या अधिवेशनात समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागितली. गेल्या आठवड्यात याबाबत लेखी पत्र सुद्धा दिले. मग ही माहिती त्यांना आज अखेर का देण्यात आली नाही? असा सवाल त्यांनी केला. जमीनीच्या मोबदल्यासंदर्भात राज्य सरकारचा कोणताही निर्णय स्पष्ट झालेला नाही. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोणतीही गोष्ट रेटून व लादून करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून 86 लाख रूपयांची शासनाची फसवणूक केली, तेच राजेश क्षीरसागर आता शक्तीपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून 50 हजार कोटीत ढपल्यामध्ये हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करत असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गामुळे महापूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन विभागातील इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये होणारी पर्यावरणाची हाणी, क्षारपड जमीनीची समस्या, शहरी व ग्रामीण भागातील वाढीव पुरबाधित भागातील गोरगरीब लोकांचे होणारे नुकसान, महामार्गाच्या दोन्ही बाजूस संरक्षित भींत असल्याने गावाचे, शेतीचे व वाडी वस्तीचे होणारे विभाजन, ऊस उत्पादनात घट झाल्याने भविष्यात साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याबाबत मुख्यमंत्री ब्र शब्द काढण्यास तयार नसल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List