ऊसतोडणीमुळे धोका वाढला; बिबटे मानवी वस्तीकडे
ऊसतोडीच्या काळात बिबटय़ांच्या लपण्याचे साधन संपुष्टात आल्याने बिबटय़ांचा मानवी वस्तीकडे मुक्तसंचार मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तसेच या काळात पशुधनावर हल्ले झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोपरगाव तालुक्यातही बिबटय़ाचे पशुधनावरील हल्ले मोठय़ा प्रमाणात वाढू लागले असून, वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांसह नागरिकांकडून होत आहे.
यापूर्वी ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना उसाच्या फडात अनेकवेळा बिबटय़ांचे बछडे आणि बिबटे आढळून आले आहेत. या काळात या बछडय़ांची आई अधिक आक्रमक झालेली असते. वन विभागाने यापूर्वी अनेकदा अनेक बछडे त्यांच्या आईच्या कुशीत नैसर्गिकरीत्या सोपवले आहेत.
ऊसतोडीमुळे बिबटय़ांना त्यांना नेहमीची लपण्याची जागा राहिली नाही. नवीन सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात बिबटे सैरभैर होऊन मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले असून, चांदेकसारे परिसरात बिबटय़ांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. काल गुजरस्थळ, आहेरवस्ती परिसरात त्याने सुरेश भिमाजी होन यांची कालवड व एका कुत्र्याची शिकार करत बिबटय़ाने त्यांना फस्त केले. मानवी वस्तीकडे बिबटय़ाने आपला मोर्चा वळवण्याने शेतकरी व महिला मोठय़ा दहशतीखाली आलेल्या आहेत.
कर्मवीर शंकरराव काळे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची ऊसतोडणी मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याने बिबटय़ांचा हक्काचा निवारा कमी होत आहे. यामुळे बिबटे सैरभैर होऊन लपण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला असून, हल्ले वाढण्याचे धोके निर्माण झाले आहेत.
चांदेकसारे, सोनेवाडी, पोहेगाव या परिसरात दाट लोकवस्ती असून, प्रत्येक शेतकऱयाकडे शेळ्या-मेंढय़ा, गाई-म्हशी आदी जनावरांचे गोठे आहेत. आठवडय़ाभरात या बिबटय़ाने सोनेवाडी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, पोहेगाव आदी परिसरात पाळीव प्राण्यांची शिकार करत आपला दबदबा निर्माण केला आहे. विशेष म्हणजे बिबटय़ांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात सात-आठ बिबटय़ांची संख्या असल्याचे लक्षात येते. या बिबटय़ांचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच अशोक होन व गौतम बँकेचे संचालक शरद होन यांनी केली आहे.
ऊसतोड करताना काळजी घेण्याचे आवाहन
n कोपरगाव तालुक्यामध्ये ऊसतोडणी हंगाम सुरू झाला असून, ऊसतोडीमुळे बिबटय़ांचा धोका वाढला आहे. यामुळे ऊसतोडणी करताना परिसराची पाहणी करून परिसरात आवाज करून बिबटय़ा नसल्याची खात्री करूनच तोडणी सुरू करावी. शेतकऱयांनी व नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List