कॉलद्वारे होणारी आर्थिक फसवणूक थांबणार! सायबर गुन्हे रोखण्यासाठी ट्रायने उचलले पाऊल
देशात सध्या सायबर गुन्हेगारी वाढली असून फोनद्वारे अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने एक नवीन नियम आणला आहे. या नव्या नियमानुळे आर्थिक फसवणूक थांबणार आहे. देशातील सर्व मोठ्या बँका, म्युच्युअल फंड कंपन्या, शेअर बाजारासंबंधी संस्था आणि पेन्शनसी जोडलेल्या संघटनांनी ग्राहकांना कॉल करण्यासाठी 1600 पासून सुरू होणाऱ्या नंबरचा वापर करावा, असे निर्देश ट्रायने दिले आहेत. या नव्या नियमामुळे सर्वसामान्यांची फोनद्वारे होणारी आर्थिक फसवणुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
देशभरात 10 अंकी मोबाइल नंबरवरून फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. लोकांना फोन करून त्यांच्याकडून ओटीपी, यूपीआय पिनसह अन्य गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी ट्रायने 1600 नंबरची सीरीज सुरू केली आहे. या सीरीजमुळे सरकारी किंवा खासगी संस्थेच्या कॉलची एक वेगळी ओळख निर्माण होईल.
जर समजा 1600 सीरीजवरून फोन आल्यास तो अधिकृत संस्थेचा असेल असे समजण्यात येईल. ट्रायने नवीन नियम लागू करण्यासाठी डेडलाइन सुद्धा ठरवली आहे. म्युच्युअल फंड आणि असेट मॅनेजमेंट कंपन्यांना 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 1600 नंबरचा वापर सुरू करावा लागेल. मोठ्या बँका म्हणजे सरकारी आणि खासगी किंवा विदेशी बँकांना 1 जानेवारी 2026 पासून 1600 सीरीजचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मार्च 2026 पासून सहकारी बँका, ग्रामीण बँका या सीरीजचा वापर करतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List