वादळी वारा, अवकाळीने फळबागांचे नुकसान, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यांना फटका
पंढरपूर मंगळवेढा येथे एकीकडे वाढत्या उन्हामुळे हैराण झालेले नागरिक शनिवारी रात्री वादळी वाऱयासह आलेल्या अवकाळी पावसामुळे चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत. या पावसाचा आंबा, द्राक्षे, डाळिंब, शेवगा या पिकांना फटका बसला आहे. वाऱयामुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे, तर झाडाखाली आंब्यांच्या कैऱयांचा सडा पडला होता. या पावसाने रात्रभर उकाडय़ापासून नागरिकांची सुटका झाली असली तरी रविवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवला.
शनिवारी सायंकाळी पंढरपूरच्या पश्चिम भागात काळे ढग साचायला सुरुवात झाली. अधूनमधून विजेचा कडकडाट होत होता. तर विजेबरोबर वादळी वारा जोरजोरात वाहू लागल्याने हवेत धुळीचे लोट निर्माण होऊ लागले. या वादळीवाऱयाबरोबर रात्री 8 वाजता ढगांचा प्रचंड गडगडाट सुरू झाला. त्यानंतर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली.
पावसाबरोबर वादळी वारा असल्याने आंब्याच्या झाडावरील आंबे गळून पडले. अनेक शेतकऱयांच्या डाळिंब बागा फुलकळीत आहेत. पावसाचा फटका बसल्याने फुलकळी गळून पडली आहे. हरभरा, गहू, मका, ज्वारी काढणी, मळणी सुरू असून, यालाही पावसाचा फटका बसला. हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून बहुतांश शेतकरी शेतात शेवगा पीक घेत आहेत. सध्या शेवगा पिकाचा हंगाम सुरू आहे. झाडांवर शेवगा शेंगा बहरलेल्या आहेत. मात्र, रात्री आलेल्या वादळी वारा व पावसाने शेंगा मोडून गळून पडल्यामुळे शेतकऱयांचे नुकसान झाले.
पंढरपूर तालुक्यात कासेगाव, टाकळी, खर्डी, बोहाळी, तनाळी, शेटफळ, उंबरगाव या भागात द्राक्ष बागा जास्त आहेत. रात्री आलेल्या पावसामुळे उतरणीला आलेल्या द्राक्षांवर पाणी साचून राहिल्याने मणी काळे पडले. तर पावसाच्या माऱयाने मणी फुटून गळून पडत आहेत.
बेदाणा काळा पडण्याची भीती
– द्राक्षाला दर कमी असल्याने शेतकरी बेदाणा निर्मिती करत आहेत. त्याकरिता बेदाणा शेडवर टाकण्यात आलेला आहे. मात्र, रात्री आलेल्या वादळी वारा व पावसाने शेडवरील आच्छादन (कागद) उडून, फाटून गेले आहेत. त्यामुळे बेदाणा पावसात भिजला असून, वाऱयामुळे धूळ उडून बेदाण्यावर पडली आहे. यामुळे बेदाणा काळा पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List