मतचोरीतूनच महाराष्ट्रात सत्ता आली, महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही; हर्षवर्धन सपकाळ यांचे टिकास्त्र
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता मिळवली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे, त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघात मतचोरी कशी करण्यात आली हे काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. आता मतचोरीचा आणखी एक बॉम्ब राहुल गांधी यांनी फोडला आहे. चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाच्या मतदारयादीत कसा घोटाळा केला? हे आज उघड केले. निवडणूक आयोग दुटप्पीपणा करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरीवर स्पष्ट उत्तर न देता राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणे बोलत आहेत. मतचोरी करून भाजपा व नरेंद्र मोदी यांना भारताचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश करायचा आहे, असा गंभीर आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींचा विजय…
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वारंवार केंद्र सरकारची पोलखोल केली असून नोटबंदी, कोरोना संकटावरही त्यांनी मोदी सरकारला धोक्याचा इशारा दिला होता पण मोदी सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागली आहे. जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी ८ वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि जीएसटीमध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. जीएसटीमधील सुधारणा हा राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी विचाराचा मोठा विजय असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस २२ सप्टेंबर रोजी राज्यभर दुकानदार, व्यापारी आस्थापने येथे पेढे वाटून साजरा करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांना सांगितले.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या…
मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत. शेतपिकाबरोबरच लाखो एकर शेतजमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. आताचा हंगाम पुर्ण वाया गेला असल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्यावीत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशा मागण्याही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्या.
मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे फडणवीसांचे काम…
राज्यात तीसरी भाषा लादण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असून मराठी भाषा ही केवळ भाषा नसून महाराष्ट्र धर्म व संस्कृती आहे. तिसरी भाषा लादून देवेंद्र फडणवीस मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. मराठी भाषेसह सर्व भाषा गुण्यागोविंदाने नांदल्या पाहिजेत, विविधेत एकता ही भारताची ओळख आहे ती टिकली व जपली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. पण भाजपा मात्र ही ओळख पुसण्याचे काम करत आहे. डॉ. नरेंद्र जाधव समिती ही हिंदी भाषा लादण्यासाठी गठीत करण्यात आली आहे. समितीचा निर्णय काहीही येवो भाषेची सक्ती लादू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दिला आहे.
कोकण विभागाची आढावा बैठक…
कोकण विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली. याबैठकीत पक्ष संघटनेचा विस्तार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याविषयी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. युती व आघाडीचा धर्म पाळताना काही तडजोडी कराव्या लागतात त्यामुळे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व करता आले नाही. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List