अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट; मुख्यमंत्री फडणवीस यांची चौंडी येथे घोषणा
चित्रपट हे एक असे माध्यम आहे त्यामधून सर्वांपर्यंत इतिहास पोहोचू शकतो. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपटाची निर्मिती झाली आणि त्यातून त्यांचा देदिप्यमान इतिहास नव्या पिढीला माहिती झाला. त्यामुळेच पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, अहिल्यादेवींच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असेही त्यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी 28 वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत क्रांती घडवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य त्यांनी समर्पित वृत्तीने केले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करताना सरकारी तिजोरीतून खर्च न करता, स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. एवढी श्रीमंती असतानाही त्या साधेपणाने जीवन जगल्या. त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी धन खर्च केले, म्हणून त्या ‘लोकमाता’ ठरल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श आज 300 वर्षांनंतरही तितकंच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्ताने शासनाने 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यांच्या नावाने एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ आणि त्यांच्यावर आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांचे कार्य देशभरात पोहोचविले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिदि, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, सुरेश धस, आमदार विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री अण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या समोरच श्रेयवादाची लढाई आमदार गोपीचंद पडळकर, सभापती प्रा. राम शिंदे आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच घोषणाबाजी केल्यामुळे आज अंतर्गत लढाई पाहायला मिळाली. चौंडी येथे हा एक चर्चेचा विषय ठरला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List