रांजणगावात उद्योगमंत्र्यांचा दौरा संपताच पुन्हा दूषित पाणी ओढ्यात, एमआयडीसीतील कंपन्याही मंत्र्यांचे ऐकेनात
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दौरा करून पंधरा दिवस होत नाहीत, तोच रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एमईपीएल कंपनीने दूषित पाणी पुन्हा निमगाव भोगीच्या ओढ्यात सोडले आहे. त्यामुळे उदय सामंत यांचा दौरा अपयशी ठरला असेच म्हणावे लागत असल्याचे सरपंच ज्योती सांबारे, माजी सरपंच अंकुश इचके यांनी म्हटले आहे.
पंधरा मे रोजी सामंत यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये निमगाव भोगी ग्रामस्थांच्या विनंतीनुसार महाराष्ट्र एनव्हायरो लिमिटेड कंपनीच्या दूषित पाण्यासंदर्भात पाहणी दौरा केला होता. तसेच तातडीने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. दौऱ्यानंतर कंपनीने काही दिवस ओढ्यात केमिकल सोडणे बंद केले होते. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा केमिकलयुक्त पाणी ओढ्यात सोडले असल्याने निमगाव भोगी ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, उप अभियंता एमआयडीसी रांजणगाव, उपप्रादेशिक अधिकारी जोग सेंटर वाकडेवाडी पुणे, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे यांना निवेदन देण्यात आल्याचे सरपंच ज्योती लक्ष्मण सांबारे यांनी सांगितले. याप्रसंगी विकास रासकर, रामदास सांबारे, बाळासाहेब राऊत, विकास रासकर, निळू व्यवहारे, चंद्रकांत रासकर, काळूराम व्यवहारे, भूषण ठाणगे आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List