उजनी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू; नुकताच बारावी झाला होता पास
कुगाव ते कळाशी बोट दुर्घटना व रायगाव येथे वीज पडून घडलेल्या अपघातात तालुक्यातील पती- पत्नी, चिमुकले यांसह सातजणांचा मृत्यू झाला होता. या जखमा ताज्या असतानाच, आज करमाळा तालुक्यातील रामवाडी येथील ऋषिकेश वारगड या तरुणाचा उजनीच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. ऋषिकेश हा नुकताच 75 टक्के मार्क मिळवून बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाला होता.
उजनीतील पाणी कमी झाल्यामुळे शेतकऱयांना विद्युत पंप नदीपात्रात बसवावे लागले होते. कालपासून रामवाडी-निमतवाडी परिसरातील उजनी पात्रात वरील पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे नदीपात्रातील विद्युत पंप पाण्याबाहेर काढण्यासाठी शेतकऱयांची धांदल उडाली होती.
रामवाडी येथील तरुण ऋषिकेश वारगड आपल्या चुलत्यासह मोटार काढण्यासाठी गेला होता. नदीपात्रात वरून येणाऱया वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याचे चुलते व चुलतभाऊ यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र, त्यांना त्यात अपयश आले. या घटनेमुळे रामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी ऋषिकेश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
रामवाडी येथे रेल्वे प्रशासनाकडून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी त्यांनी भराव टाकला आहे. या भरावामुळे या परिसरात जास्त पाणी तुंबून प्रवाह वाढला होता. याचा अंदाज ऋषिकेशला आला नसल्यामुळे तो बुडाला, अशी चर्चा सुरू होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List