प्राण्यांच्या हल्ल्याचा वन विभागाला साडेतीन कोटींचा भुर्दंड
जंगलातील मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. जीवनसाखळीला धक्का लागल्याने बिबटय़ासारख्या प्राण्यांचा भक्ष्याच्या शोधासाठी मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत आहे. वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष वाढल्याने दोन वर्षांत तीनजणांना प्राण गमावावा लागला, तर 15 जण जखमी झाले आहेत. 2 हजार 849 शेळ्या-मेंढय़ांसह पाळीव प्राणी ठार झाले आहेत. रानडुकरे, हरीण, मोर यांच्यापासून शेतीचे नुकसान झाल्याच्या 224 घटना घडल्या आहेत. जिह्यात 3 हजार 92 प्रकरणांत वन विभागावर 3 कोटी 51 लाख 48 हजार 145 रुपयांची भरपाई देण्याची वेळ आली आहे.
नगर जिह्याच्या अकोले तालुक्यात घनदाट जंगलाचे प्रमाण जास्त आहे. संगमनेर, कर्जत या तालुक्यांतही जंगलाचे प्रमाण आहे. रेहकुरी (कर्जत) अभयारण्य काळविटांसाठी राखीव आहे. जंगलांचे प्रमाण घटत असल्याने वन्यप्राणी मानवीवस्तीकडे येत आहेत. बिबटे उसाच्या शेतात आश्रयाला येण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीजवळील उसाच्या शेतामध्ये बिबटय़ांनी आश्रय घेतल्याची संख्या वाढत आहे. ऊसतोडणीच्या वेळेस बिबटय़ा आक्रमक झाल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून हल्ले वाढले आहेत. बिबटय़ाच्या हल्ल्यामध्ये तीन बालकांना प्राण गमावावे लागले. यामध्ये लोणी, संगमनेर, श्रीगोंदे या भागात घटना घडल्या आहेत. तर काहीजण जखमी झाले आहेत. दोन वर्षांत 17 जण जखमी झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यावर जखमांच्या प्रमाणात भरपाई दिली जाते. वन विभागाकडून गंभीर दुखापतीला 1 लाख 25 हजार, तर किरकोळ दुखापतीला 25 हजारांची भरपाई दिली जाते.
वन विभागातर्फे दिलेली भरपाई
– तीन मृत बालकांसाठी ः 45 लाख,
– 15 जखमींना ः 8 लाख 45 हजार, 2849 रुपये.
– शेळ्या-मेढय़ांसह लहान जनावरांचा मृत्यू ः 2 कोटी 93 लाख 71 हजार 652 रुपये.
– रानडुकरे, हरीण आणि मोरांमुळे 224 शेतपिकांचे नुकसान ः 14 लाख 30 हजार 997 रुपये.
– जिह्यात एकूण 3092 प्रकरणांत ः 3 कोटी 51 लाख 48 हजार 145 रुपयांची भरपाई
बिबटय़ा आढळल्यास हे करा
– गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा नागरी वसाहतीमध्ये, हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये.
– बिबटय़ाची पिल्ले आढळल्यास तत्काळ संबंधित वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
– वनप्राण्यांच्या पिल्ल्लांचे फोटो, सेल्फी काढू नये.
– बिबटय़ाच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वन विभागाच्या वतीने आता 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. या भरपाईपैकी 10 लाख पीडित कुटुंबाच्या बँक खात्यात वर्ग केले जातात. उर्वरित रक्कम फिक्स डिपॉझिट स्वरूपात दिले जातात.
– वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आवश्यक ते वैद्यकीय प्रमाणपत्र, पंचनामा ही कागदपत्रे वन विभागाचे अधिकारी संबंधित विभागाकडून मिळवून प्रस्ताव तयार करतात, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List