नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने पगारदार नोकरदारांना दिलेल्या कर्जापैकी तब्बल 28 कोटी रुपयांची थकबाकी अजून येणे आहे. या थकबाकी वसुलीसाठी बँकेकडून विशेष धडक मोहीम राबवली जाणार असून, त्यासाठी कर्मचाऱयांची पथके तयार करण्यात आली आहेत.
सांगली जिल्हा बँकेकडून शेतकऱयांसह साखर कारखाने, उद्योगधंदे, बचत गट याशिवाय नोकरदार या घटकांना कर्जपुरवठा केला जातो. एकीकडे शेतकऱयांकडील कर्जवसुली नियमित होत असताना पगारदार नोकरदारांच्या कर्जवसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी नोकरदारांचे 56 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. त्या दरम्यान बँकेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर 28 कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली.
शिक्षकांच्या नावावर काढले कर्ज
पगारदारांच्या थकबाकीत आटपाडीतील एका शिक्षण संस्थेने शिक्षकांच्या नावावर काढलेले तब्बल 22 कोटी रुपये थकीत होते. याप्रकरणी बँकेने संबंधितांना वसुलीच्या नोटिसा दिल्या होत्या. मात्र, वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, बँकेने वसुलीसाठी शिक्षकांकडे तगादा लावला आहे, असेही बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जूनअखेरपर्यंत 15 कोटी वसूल करणार – शिवाजीराव वाघ
सरकारी कर्मचाऱयांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी आराखडा तयार केला आहे. जूनअखेर 15 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचाऱयांची विशेष पथके नियुक्त केली आहेत. थकबाकी भरली नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List