लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत कधीच जाणार नाही, शरद पवार यांनी धुडकावली मोदींची सोबत येण्याची ऑफर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोबत येण्याची दिलेली ऑफर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी साफ धुडकावून लावली आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही, त्यांच्यासोबत आम्ही कधीच जाणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांतील मतदानाची परिस्थिती पाहता मोदी अस्वस्थ झाले आहेत. याच अस्वस्थेतून ते अशी वक्तव्ये करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
देशात आज संसदीय लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. पेंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
एखाद्या पक्षाला नकली म्हणण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला?
काँग्रेस असेल किंवा आणखी दुसरा कोणता एखादा पक्ष असेल. विचाराने आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये ते जात असतात. ते लोकांचे प्रश्न मांडत असतात. लोकांच्या सुख-दुःखावर लक्ष पेंद्रित करत असतात. त्यांना नकली म्हणण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी दिला? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
– नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर आहेत, त्यांनी काही गोष्टींच्या बाबतीत तारतम्य पाळले पाहिजे. पंतप्रधान पद हे एक इन्स्टिटय़ुशन आहे. मोदी यांची अलीकडच्या काळातील भाषणे पाहिल्यानंतर असे वाटते की, या इन्स्टिटय़ुशनची प्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांनी पाळली नाही, असे शरद पवार म्हणाले.
– एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱयांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याची ऑफर दिली. मोदी म्हणाले, महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते 40 वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे विधान त्यांनी केले आहे. याचा अर्थ असा की जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. 4 जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या. सर्व स्वप्ने पूर्ण होतील, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मोदींची ऑफर म्हणजे पराभवावर शिक्कामोर्तब – नाना पटोले
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यातील मतदानानंतर भाजप 150 जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. आपला पराभव होत असल्याची पंतप्रधान मोदी यांनाही खात्री पटली असल्यानेच ते चिंतेत आहेत. मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची जाहीर ऑफर म्हणजे भाजपच्या पराभवावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे, असे कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List