केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात; शरद पवार यांची टीका
देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्या आत्महत्येचे कारण त्यांच्या कष्टाची त्यांना किंमत मिळत नाही. उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या शेतमालाला किंमत मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात आहेत. पण मोदी या सगळय़ांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली.
निपाणी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे. हिंदुस्थान हा लोकशाहीचा देश आहे. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्य मिळण्यासाठी या देशामध्ये अनेकांनी आयुष्य खर्ची घातले. स्वातंत्र्यानंतर हा देश लोकशाहीच्या पद्धतीने चालवायचा हा निर्णय काँग्रेसच्या नेतृत्वाने केला. शेजारचे देश पाहता हिंदुस्थान हा एकमेव देश असा आहे की, इथे फक्त लोकांचेच राज्य प्रदीर्घ काळ राहिले आहे. त्यामुळे सर्वांनी सामान्य माणसाचा अधिकार आणि हा देश चालवायला लोकशाहीची पद्धती याच्याशी कधीही तडजोड केली नाही. ही निवडणूक म्हणजे लोकशाहीची परीक्षा आहे, असे पवार म्हणाले.
काँग्रेसने लोकहिताचे निर्णय घेतले, भाजपसारख्या नुसत्या घोषणा केल्या नाहीत. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने पदवीधर बेरोजगारांसाठी तीन हजार रुपये प्रतिमहिना देण्याचा तर कुटुंबातील महिलेला दोन हजार रुपये प्रतिमहिना देण्याचा निर्णय घेतला गेला. तेलंगणातील काँग्रेस सरकारही शेतकऱयांना दरवर्षी 15 हजारांची मदत करते. 18 वर्षांवरील महिलांना 2500 रुपये दिले जातात. मोफत बस प्रवास दिला जातो आणि गॅस सिलिंडर 500 रुपयांमध्ये व ज्येष्ठांना 400 रुपयांचे पेन्शन मिळते. काँग्रेसने लोकहिताचे निर्णय घेतले आहेत भाजपसारख्या नुसत्या घोषणा केल्या जात नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्रातच पाच टप्प्यांत निवडणूक कशासाठी?
काल पंतप्रधान महाराष्ट्रात होते, आजही आहेत. चांगली गोष्ट आहे की, त्यांना महाराष्ट्रात पुनः पुन्हा यावे लागतेय. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्याची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये आहे. कशासाठी? जर कर्नाटकची किंवा तामीळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? याचे कारण असे की, मोदींना यंत्रणांमार्फत कळले असावे की, त्यांना यश मिळायची शक्यता नाही. त्यामुळे खोटय़ा गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मत मिळवायचे, हे सूत्र त्यांनी अवलंबले असावे, असे शरद पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List